
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. भारताने पाकिस्तानवर अनेक पद्धतीने कारवाई केली आहे. तसेच भारतीय लष्कराला कारवाईची मोकळी दिली आहे. त्यामुळे कंगाल असलेला पाकिस्तान चांगलाच घाबरला आहे. पाकिस्तानला आपण अलर्ट असल्याचे दाखवण्यासाठी अब्जावधी रुपये खर्च करावे लागत आहे. आर्थिक आडचणीत आलेल्या पाकिस्तानपासून चीनसुद्धा लांब राहत आहे. या प्रसंगात पाकिस्तानला युद्धाचा खर्च परवडणार असणार आहे का?
भारत-पाकिस्तान तणावाचा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर पडत आहे. अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानचा खजिना युद्धापूर्वीच रिकामा होत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने उचललेल्या पावलांमुळे पाकिस्तान युद्धापूर्वीच भिकेला लागला आहे. भारताच्या वॉटर स्ट्राइक आणि फायनेन्शियल स्ट्राइकचा झटका पाकिस्तानची अर्थव्यवस्था सहन करु शकणार नाही.
दीर्घकाळापासून आर्थिक चणचणीत असलेल्या पाकिस्तानचे आर्थिक संकट आणखी गंभीर होत आहे. पाकिस्तानला फक्त अलर्ट राहण्यासाठी रोज चार अब्ज पाकिस्तानी रुपये खर्च करावे लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैन्याची नियंत्रण रेषेवर तैनाती करणे, विमानांसाठी लागणारे इंधन, नियंत्रण रेषेवर पाठवावे लागणारे सामान यासाठी पाकिस्तानमधील शहबाज शरीफ सरकारला रोज 13 मिलियन डॉलर (जवळपास 4 अब्ज पाकिस्तानी रुपये) खर्च कारावे लागत आहे.
पाकिस्तानच्या वार्षिक लष्करी अर्थसंकल्प 7.5 अब्ज डॉलर्स (सुमारे 2.10 लाख कोटी पाकिस्तानी रुपये) आहे. आता भारतासोबत निर्माण झालेल्या तणावादरम्यान हाय अलर्टवरील खर्चाची गणना केली तर त्याचा अंदाजे मासिक खर्च 400 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 11,253 कोटी पाकिस्तानी रुपये) पर्यंत पोहोचू शकतो. संरक्षण तज्ज्ञ जे. के. बन्सल यांनी सांगितले की, कूटनीतीच्या व्यासपीठावर पाकिस्तान जगात वेगळा पडला आहे. पैशांच्या अडचणीमुळे पाकिस्तान पोकळ धमक्या देत आहे. दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याने सुरु केलेले अनेक युद्धाभ्यास बंद करण्यात आले आहे.
भारताने एक रुपया खर्च न करता केवळ कूटनीती आणि राजनैतिक निर्णयातून पाकिस्तानला जेरीस आणले आहे. पाकिस्तानकडून होणारी सर्व आयात-निर्यात थांबवली आहे. पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांवर प्रवेश बंद केला आहे. पाकिस्तानी सेलिब्रिटेज आणि राजकीय लोकांचे सोशल मीडिया अकाऊंट ब्लॉक केले आहे.