चीनसमोर भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, गलवानसह चार ठिकाणांवरुन चीन सैन्याची माघार, ड्रॅगनचा कबुलीनामा

india china border dispute: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि वांग यांच्यातील बैठकीचा तपशील देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, चीन-भारत संबंधांमध्ये स्थिरता दोन्ही देशांच्या लोकांच्या दीर्घकालीन हिताचे आहे. त्यामुळे दोन्ही देशांत प्रादेशिक शांतता राहणार आहे.

चीनसमोर भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, गलवानसह चार ठिकाणांवरुन चीन सैन्याची माघार, ड्रॅगनचा कबुलीनामा
India china border
| Updated on: Sep 14, 2024 | 3:03 PM

भारत आणि चीन यांच्यात सीमा वाद कायम राहिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद मिटू शकला नाही. त्यामुळे दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आल्याच्या घटना मागील काही वर्षांत घडल्या होत्या. त्यावेळी दोन्ही सैन्यात चकमकही झाली होती. परंतु आता भारत अन् चीन सीमा वाद सुटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. पूर्व लडाखमधील सैन्य चीनने मागे घेतले आहे. लडाखमधील गलवानसह चार ठिकाणांचे सैन्य मागे घेतल्याची कबुली चीनने दिली आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात गुरुवारी झालेल्या चर्चेनंतर चीनने सैन्य मागे घेतल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे दिली आहे.

चार ठिकाणांवरुन घेतली माघार

चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्त माओ निंग यांनी शुक्रवार सांगितले की, दोन्ही सैन्याने चार ठिकाणांवरुन माघार घेतली आहे. सीमेवर परिस्थिती स्थिर आहे. दोन्ही देशांच्या सैन्याने चीन-भारत सीमेच्या पश्चिमेकडील सेक्टरमधील चार पॉइंट्सवरून मागे जाण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे, ज्यामध्ये गलवान व्हॅलीचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जिनिव्हा येथे शुक्रवारी दिलेल्या वक्तव्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाची ही टिप्पणी आली आहे.

जयशंकर म्हणाले होते की, चीनसोबतच्या सैन्य माघारी संबंधित समस्यांपैकी 75 टक्के समस्या सोडवण्यात आल्या आहेत. मात्र सीमेवरील वाढते लष्करीकरण हा मोठा मुद्दा आहे.

दोन्ही देश देणार संवादावर भर

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि वांग यांच्यातील बैठकीचा तपशील देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, चीन-भारत संबंधांमध्ये स्थिरता दोन्ही देशांच्या लोकांच्या दीर्घकालीन हिताचे आहे. त्यामुळे दोन्ही देशांत प्रादेशिक शांतता राहणार आहे. चीन आणि भारत सरकार परस्पर सांमजस्य राखणे, विश्वास वाढवणे, सतत संवाद राखणे आणि द्विपक्षीय संबंधांना चालना देणे यावर भर देणार आहे. भारत आणि चीनने गुरुवारी पूर्व लडाखमधील सैन्य संपूर्ण माघारी घेण्याचे ठरवले होते, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.