आता संपूर्ण लॉकडाऊनची गरज नाही, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदींचं स्पष्टीकरण

| Updated on: Apr 08, 2021 | 9:14 PM

पंतप्रधान मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी राज्यातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरण मोहीमेवर चर्चा झाली.

आता संपूर्ण लॉकडाऊनची गरज नाही, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदींचं स्पष्टीकरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढतोय. कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. देशात आता संपूर्ण लॉकडाऊनची गरज नसल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. पंतप्रधान मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी राज्यातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरण मोहीमेवर चर्चा झाली. (no need for a complete lockdown in the country, Prime Minister Modi clarified)

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी कोरोनापासून बचावासाठी सूचना मागितल्या आहेत. देशात पुन्हा एकदा आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालीय. काही राज्यात चिंताजनक स्थिती असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशाने कोरोना संसर्गाची पहिली लाट पार केली. पण दुसरी लाट पहिल्यापेक्षा प्रभावी आहे. सर्वांसाठी हा चिंतेचा विषय आहे. यावेळी देशातील नागरिकही पहिल्यापेक्षा जास्त बिनधास्त बनले आहेत. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा युद्ध पातळीवर काम करणं गरजेचं असल्याचं मत पंतप्रधानांनी या बैठकीत मांडलं. कोरोनाला रोखण्यासाठी जनतेच्या भागिदारीसह आपले डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी आजही त्यात ऊर्जेने काम करत असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले.

मायक्रो कंटेन्मेंट झोनवर लक्ष गरजेचं

जगभरात रात्रीची संचारबंदी स्वीकारण्यात आलीय. आता आपल्याला हा नाईट कर्फ्यू कोरोना कर्फ्यू म्हणून लक्षात ठेवावा लागेल. त्याचबरोबर कोरोना रोखण्यासाठी आपल्याला मायक्रो कंटेन्मेंट झोनवर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं असल्याचंही मोदी म्हणाले. यावेळी आपल्याकडे कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्व उपाय उपलब्ध आहेत. आता कोरोना प्रतिबंधक लसही आहे, असं सांगताला लोकांच्या हलगर्जीपणावर मात्र मोदींना नाराजी व्यक्त केली आहे.

‘लसीकरण उत्सव साजरा करु’

कोरोनाची लस घेतल्यानंतरही कुठल्याही प्रकारचा बेजाबदारपणा होणार नाही याची काळजी आपण घ्यायला हवी. आपल्याला लोकांना हे वारंवार सांगावं लागेल की लस घेतल्यानंतरही मास्क आणि सावधगिरी बाळगा. 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी आपण लसीकरण उत्सव साजरा करु, असं आवाहनही मोदींनी यावेळी केलंय.

मोदींचा पंचसूत्री कार्यक्रम

लसीकरणाच्या उत्सवात जास्तीत जास्त लोकांना लस दिली जावी यासाठी आपले प्रयत्न असायला हवे. मी देशातील युवकांना आग्रह करतो की, तुमच्या आसपास 45 वर्षांवरील नागरिक आहेत, त्यांना लस देण्यासाठी सर्व प्रयत्न करा, असं आवाहनही मोदींनी केलंय. आता टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रिटमेंट, योग्य वर्तन/काळजी आणि कोविड व्यवस्थापनावर भर देणं गरजेचं असल्याचंही मोदींनी यावेळी सांगितलं.

संबंधित बातम्या :

कुठे लस उपलब्ध नाही तर कुठे रेमडेसिव्हीरच गायब, राजकारण मात्र जोरात, वाचा कुठल्या शहरात कशाचा दुष्काळ?

Corona Vaccine : लसीकरण केंद्र जाणिवपूर्वक बंद करुन चुकीच्या बातम्या पसरवण्याचं कारण काय? फडणवीसांचा सवाल

no need for a complete lockdown in the country, Prime Minister Modi clarified