देशातील विद्यार्थी एकटे नाही… राहुल गांधी पुन्हा आक्रमक; दिल्लीत वातावरण तापलं

काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा आक्रमक झाले असून, दिल्लीत विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला इंडिया आघाडीने पाठिंबा दिला आहे. गांधी स्मृती स्थळाकडे जाणाऱ्या राहुल गांधींच्या वाहनासह खासदारांच्या बसेस पोलिसांनी अडवल्याने वातावरण तापले.

देशातील विद्यार्थी एकटे नाही... राहुल गांधी पुन्हा आक्रमक; दिल्लीत वातावरण तापलं
rahul gandhi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 23, 2026 | 7:51 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. गांधी स्मृती स्थळाकडे जात असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. इंडिया आघाडीच्या खासदारांच्या तीन बसेस अडवल्याने पुन्हा वातावरण तापलं. पुन्हा एकदा दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. पोलिसांशी आंदोलकांची हुज्जत सुरू झाली आहे. यावेळी राहुल गांधी यांनीही केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला. भारतातील विद्यार्थी एकटे नाहीत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. संपूर्ण विरोधी पक्ष त्यांच्या सोबत आहोत, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

राहुल गांधी यांच्या निवासस्थानी आज इंडिया आघाडीच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सर्व खासदार गांधी स्मृती स्थळाकडे जायला निघाले. पॅरामिलिट्रीच्या सुरक्षेत खासदार गांधी स्मृती स्थळाकडे निघाले होते. पण वातावरण तापण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी राहुल गांदी आणि विरोधी पक्षांच्या बस रोखली. या बसच्या समोर बॅरिकेडिंग करण्यात आली. त्यामुळे तणाव वाढला. त्यामुळे पोलीस आणि खासदारांमध्ये तणातणी झाली. त्यानंतर 10 मिनिटांनी बॅरिकेड्स काढण्यात आले आणि मार्ग मोकळा करून देण्यात आला.

प्रियंका गांधींची पोलिसांशी चर्चा

वाद सुरू झाल्यानंतर प्रियंका गांधी ड्रायव्हरच्या सीटजवळ पोहोचल्या. त्या पोलिसांशी चर्चा करताना दिसत होत्या. राहुल गांधी आतमध्येच होते. पोलिसांच्या या भूमिकेवर राहुल गांधी प्रचंड संतापले आहेत. बस इथेच थांबवली आहे. आम्हाला पुढे जाऊ देत नाहीत. पण विद्यार्थ्यांना आमचा एकच संदेश आहे, तो म्हणजे आम्ही त्यांच्यासोबत आहोत, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

विद्यार्थी रस्त्यावर…

विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत. आपणही रस्त्यावरच असलं पाहिजे. आधी आम्हाला इंडिया गेटवर जायचं होतं. पण आम्हाला नकार दिला. त्यामुळे आम्ही गांधी स्मृती जात होतो. पण आताही आम्हाला रोखण्यात आलं. आम्हाला तीन मूर्तीलाही जायचं आहे. पण तिकडे जाण्यापासूनही रोखलं जात आहे, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

प्रतिकात्मक मार्च

दरम्यान, राहुल गांधी यांच्या निवासस्थानी तब्बल एक तास बैठक पार पडली. त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रतिकात्मक मार्च काढला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी दिल्ली पोलिसांसोबत पॅरामिलिट्री दलही तैनात करण्यात आले होते.

Follow Us