Kargil Vijay Diwas 2026: भारताच्या लष्करी इतिहासातील सर्वांत गौरवशाली अध्याय; ‘ऑपरेशन विजय’बद्दल जाणून घ्या..
कारगिल युद्ध हे भारताच्या संरक्षण प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरलं. या युद्धामुळे उत्तम समन्वय, जलद आधुनिकीकरण आणि अधिक आत्मनिर्भरतेची गरज अधोरेखित झाली. गेल्या काही वर्षांत भारताने आपली संरक्षण प्रणाली मजबूत करण्यासाठी अनेक मोठ्या सुधारणा हाती घेतल्या आहेत.

आज 26 जुलै 2026 रोजी, भारत 27 वा कारगिल विजय साजरा करत आहे. ‘ऑपरेशन विजय’मध्ये सहभागी झालेल्या शूर सैनिकांच्या धैर्याला, शौर्याला आणि त्यांच्या सर्वोच्च त्यागाला आदरांजली वाहण्याचा हा दिवस आहे. कारगिल युद्धातील भारताच्या ऐतिहासिक विजयाची आठवण जिवंत ठेवणारा हा दिवस आहे. कारगिल युद्ध हे भारताच्या लष्करी इतिहासातील सर्वांत गौरवशाली अध्यायांपैकी एक आहे. 26 जुलै 1999 च्या युद्धात भारतीय सैनिकांनी अतुलनीय शौर्य आणि निर्धार दाखवून कारगिलची बर्फाच्छादित शिखरं शत्रूच्या ताब्यातून मुक्त केली होती. यामुळे लडाखच्या खडतर पर्वतरांगांवर अभिमानाने पुन्हा एकदा भारताचा तिरंगा फडकला.
ऑपरेशन विजय
मे 1999 मध्ये कारगिलच्या संघर्षाला सुरुवात झाली होती. घुसखोरांनी नियंत्रण रेषा (LoC) ओलांडून कारगिल प्रदेशातील महत्त्वाच्या उंच शिखरांवरील भारतीय चौक्यांवर बेकायदेशीरपणे ताबा मिळवला होता. काश्मीर आणि लडाखमधील दळणवळण विस्कळीत करणं आणि काश्मीर प्रश्नावर वाटाघाटी करण्यासाठी भारतावर दबाव आणणं हा त्यांचा उद्देश होता. याविरोधात भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन विजय’ सुरू केलं. दोन महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या भीषण युद्धानंतर सर्व घुसखोरांना हुसकावून लावण्यात भारताला यश मिळालं आणि शत्रूच्या ताब्यातील प्रत्येक चौकीवर पुन्हा एकदा भारतीय तिरंगा फडकवण्यात आला.
अत्यंत कठीण लढाई
स्थानिक रहिवाशांनी 3 मे 1999 रोजी कारगिल क्षेत्रात संशयास्पद हालचाली होत असल्याची माहिती सर्वप्रथम दिली होती. परिस्थितीची खात्री करण्यासाठी तात्काळ टेहळणी पथकं पाठवण्यात आली. जमिनीवरील गस्त आणि हवाई निगराणीमुळे घुसखोरीचं खरं स्वरुप आणि व्याप्ती लवकरच उघड झाली. घुसखोरांनी श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावर नजर ठेवणाऱ्या महत्त्वाच्या उंच शिखरांवर ताबा मिळवला होता. यापैकी अनेक ठाणी 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर होती. यामुळे ही लष्करी कारवाई भारतीय जवानांसाठी अत्यंत आव्हानात्मक बनली होती. या मोहिमेत भारताचं उद्दिष्ट स्पष्ट होतं. शत्रूच्या ताब्यात असलेली प्रत्येक भारतीय चौकी परत मिळवण्याचं ध्येय साध्य करण्यासाठी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन विजय’ सुरू केलं.
जवळपास तीन महिन्यांच्या लष्करी कारवाईनंतर भारताने आपल्या ताब्यातील सर्व प्रदेश आणि चौक्या पुन्हा मिळवल्या. ही संपूर्ण मोहीम नियंत्रण रेषेचं कोणतंही उल्लंघन न करता पार पडली. कारगिल युद्ध भारताच्या इतिहासातील एक गौरवशाली अध्याय ठरलं. 14 जुलै 1999 रोजी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाला संबोधित करून ‘ऑपरेशन विजय’ यशस्वी झाल्याचं घोषित केलं. ऑपरेशन विजयमध्ये प्रत्येक सैनिकाचं योगदान महत्त्वपूर्ण होतं. कारगिल युद्धादरम्यान दाखवलेल्या त्यांच्या असामान्य शौर्याबद्दल चार सैनिकांना परमवीर चक्र, नऊ जणांना महावीर चक्र आणि 55 जणांना वीर चक्र प्रदान करण्यात आलं.
