खान सरांच्या कोचिंग सेंटरला लागणार टाळं? ‘ही’ मोठी चूक भोवली
गोळीबार प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यानंतर अटकेची टांगती तलवार असताना आता खान सरांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. पाटण्यातील त्यांचं कोचिंग सेंटर सील करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

‘खान सर’ म्हणून संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेले पाटण्याचे फैजल खान यांच्या अडचणी काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. एकीकडे गोळीबार प्रकरणी त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे, तर दुसरीकडे आता त्यांच्या केजीएस कोचिंग सेंटरवरून बिहार अग्निशमन दलाने स्पष्ट इशारा दिला आहे. अग्निसुरक्षेच्या नियमांचं पालन न केल्यास खान सर यांचं कोचिंग सेंटर सील केलं जाऊ शकतं, असं दलाने म्हटलंय. मिळालेल्या माहितीनुसार, फैजल खान यांच्या केजीएस कोचिंग सेंटरमध्ये अग्निसुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं समोर आलं आहे. बिहार अग्निशमन दलाचे डीआयजी मनोज कुमार यांनी ही माहिती दिली आहे. केजीएस कोचिंग सेंटरमध्ये अग्निसुरक्षेतील त्रुटी आढळल्या असून त्या दूर करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अधिकाऱ्यांनी पुढे असंही स्पष्ट केलंय की जर या त्रुटी दूर केल्या नाहीत, तर जिल्हा अग्निशमन अधिकारी केजीएस कोचिंग सेंटर सील करतील.
पाटणा इथल्या खान सरांची कोचिंग संस्था ‘खान ग्लोबल स्टडीज’ अग्निसुरक्षा नियमांचं कथित उल्लंघन केल्यामुळे वादात सापडली आहे. बिहार अग्निशमन सेवेनं केलेल्या तपासणीत सुरक्षा मानकांमध्ये मोठ्या त्रुटी आढळून आल्या, ज्यामुळे प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. 15 दिवसांच्या आत मानकांची पूर्तता न केल्यास खान सरांची कोचिंग संस्था बंद केली जाऊ शकते.
खान सरांचे पाटण्यात दोन कोचिंग सेंटर आहेत. एक बोरिंग रोडवर आणि दुसरं मुसल्लापूर हाट इथं हे सेंटर आहेत. यापैकी मुसल्लापूर हाट इथल्या कोचिंग सेंटरबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. 2 जून रोजी या कोचिंग सेंटरबाहेर दगडफेक, गोंधळ आणि गोळीबार झाला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये खान सरांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटचे दोन सुरक्षारक्षक गोळीबार करताना दिसले. त्यानंतर त्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. चौकशीदरम्यान सुरक्षारक्षकांनी दावा केला की त्यांनी खान सरांच्या सूचनेवरूनच गोळीबार केला होता. त्यानंतर खान सर यांच्याविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला.
दरम्यान फैजल खान उर्फ खान सर या प्रकरणात आत्मसमर्पण करणार नसल्याची माहिती समोर येत आहे. खान सरांचे वकील अरविंद कुमार मौर्य यांनी स्पष्ट केलं की ते अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करतील. कारण खान सरांच्या सुरक्षारक्षकांनी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला होता आणि त्यात कोणीही जखमी झालेलं नाही, असा दावा त्यांनी केला.