
Weather Update : सध्या हवामानात बदल होताना पाहायला मिळत आहे. थंडी थोडी कमी झालेली असून उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकही हैराण झाले आहेत. असे असतानाच आता हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्याचा परिणाम म्हणून आता देशतील काही भागांत पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रात हा पाऊस बरसणार का, असेही विचारले जात आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार अंदमान आणि नकोबार बेटासमूहात 21 फेब्रुवारी रोजी तर 22 फेब्रुवारी रोजी दक्षिण तामिळनाडू, केरळमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर आगामी सात दिवसांत उत्तर पश्चिम भारताच्या मैदानी भागात कमाल तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.
हिंद महासागर तसेच दक्षिण-पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याच्या परिणामस्वरुप आगामी 24 तासांत हा कमी दाबाचा पट्टा श्रीलंकेच्या दिशेने सरकेल. त्यानंतर 19 फेब्रुवारी रोजी आणखी एक नवा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे उत्तराखंड, अंदमान-निकोबारमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी तामिळनाडू आणि केरळमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. 23 फेब्रुवारी रोजी हिमाचल प्रदेशमध्ये पाऊस होऊ शकतो.
दुसरीकडे पुढच्या सात दिवसांत उत्तर आणि पश्चिम भारतात तपामानात वाढ होईल. पूर्व भारतात तापमान 3 अंश सेल्सिअसने वाढू शकते. महाराष्ट्रातही तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते. दरम्यान, सध्याची हवामानाची स्थिती लक्षात घेता महाराष्ट्राची नेमकी स्थिती काय? असा प्रश्न विचारला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सध्यातरी पावसाचे संकट नाही. यासह आगामी काही दिवसांत दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमानात वाढ होऊ शकते.