मोठी बातमी! आयसीयूमध्ये भीषण आग, तब्बल सहा रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू, घटनेने खळबळ

अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत सहा रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच आम्ही लगेचच रूग्णांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आलाय.

मोठी बातमी! आयसीयूमध्ये भीषण आग, तब्बल सहा रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू, घटनेने खळबळ
fire
| Updated on: Oct 06, 2025 | 7:25 AM

एक अत्यंत धक्कादायक अशी घटना घडलीये. अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत सहा रुग्णांचा मृत्यू झाला. ही घटना राजस्थानमधील जयपूर येथील सवाई मान सिंह (एसएमएस) रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली. मृतांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच लगेचच मदतकार्य सुरू करण्यात आले. आयसीयूमध्ये उपचार घेत असलेले जवळपास सर्व रूग्ण बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यांना बाहेर काढणे शक्य झाले नाही. ही आग नेमकी कशाने लागली याची माहिती देखील प्रशासनाकडून देण्यात आली. पोलिसांनी घटनेची चाैकशी सुरू केलीये.

एसएमएस रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरचे प्रभारी डॉ. अनुराग धाकड यांनी नुकताच ही आग कशी लागली आणि नेमके काय घडले, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. आयसीयूमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने काही शेकंदामध्ये ही आग सर्वत्र पसरली. यादरम्यान विषारी धूर देखील निघाला. ज्यावेळी ही आगीची घटना घडली, त्यावेळी आयसीयूमध्ये 11 रूग्ण होते. प्रशासनाकडून लगेचच आगीची घटना कळाल्यानंतर मदतकार्य सुरू करण्यात आले.

आग दुसऱ्या मजल्यावर लागली होती. एक ट्रॉमा आयसीयू आणि एक सेमी-आयसीयू आमच्याकडे आहे. आयसीयूमध्ये उपचार सुरू असलेले रूग्ण गंभीर होते आणि जवळपास सर्वचजण बेशुद्ध अवस्थेत होती. ट्रॉमा सेंटर टीमने आमच्या नर्सिंग ऑफिसर्सनी आणि वॉर्ड बॉईजनी त्यांना ताबडतोब ट्रॉलीवर चढवले आणि आयसीयूमधून बाहेर काढले. आग अचानक भडकल्याने त्यांना जितक्या रूग्णांना बाहेर काढणे शक्य होते, तेवढ्या रूग्णांना त्यांनी बाहेर काढले.

आयसीयूतून बाहेर काढलेल्या रूग्णांना लगेचच आम्ही दुसऱ्या रूग्णालयात देखील शिफ्ट केले. त्यापैकी सहा रुग्णांची प्रकृती गंभीर होती. आम्ही त्यांना सीपीआरने पुन्हा जिवंत करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना वाचवता आले नाही. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि गृह राज्यमंत्री जवाहर सिंग यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्याठिकाणी आग लागली तिथे देखील भेट घेतली. या घटनेने देशभरात मोठी खळबळ उडाली आहेे.