IMD : मान्सून दाणादाण उडवणार, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झोडपणार, देशातील या भागाला अलर्ट जारी

IMD Heavy Rain Alert : महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात मान्सूनचा पाऊस पडताना दिसत आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात धोकादायक हवामान प्रणाली सक्रिय झाली असून तिचा परिणाम देशाच्या अनेक भागांवर दिसू लागला आहे.

IMD : मान्सून दाणादाण उडवणार, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झोडपणार, देशातील या भागाला अलर्ट जारी
Heavy Monsoon Rain Alert News
| Updated on: Jun 07, 2026 | 7:23 PM

मान्सून भारतात दाखल झाल्यापासून अनेक भागात पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. आता आगामी काळात मान्सून नागरिकांची दाणादाण उडवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात मान्सूनचा पाऊस पडताना दिसत आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात धोकादायक हवामान प्रणाली सक्रिय झाली असून तिचा परिणाम देशाच्या अनेक भागांवर दिसू लागला आहे. या प्रणालीमुळे बिहारसह पश्चिम बंगाल, ओडिशा आणि संपूर्ण ईशान्य भारतात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.

पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

ईशान्य भारतासोबतच पश्चिम बंगालच्या किनारी आणि उत्तर जिल्ह्यांमध्येही या चक्राकार प्रणालीचा तीव्र परिणाम दिसून येणार आहे. कोलकाता, दीघा, हावडा तसेच उत्तर आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यांत सकाळपासूनच अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे, पुढील 48 तास असेत हवामान राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने बिहारच्या मैदानी भागातील नागरिकांना पुढील 96 तास हवामान आणखी गंभीर होण्याचा इशारा दिला आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह 50 ते 70 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

विजा पडण्याचा घोका

वादळी वाऱ्यांसोबतच बिहारच्या विविध भागांत वीज पडण्याचाही मोठा धोका व्यक्त करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने शेतकरी आणि नागरिकांना वादळाच्या काळात मोकळ्या मैदानात किंवा मोठ्या झाडाखाली थांबू नये, असे आवाहन केले आहे. नागरिकांनी घरात सुरक्षित राहावे आणि विजेवर चालणारी उपकरणे बंद ठेवावीत, असा सल्लाही देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांत मुसळधार पाऊस

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीच्या भागात काल रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. समुद्रकिनारी भागात मान्सून सक्रिय झाल्याने सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. मुंबई आणि उपनगरांत पावसासोबत हायटाइडचाही इशारा देण्यात आला आहे. मान्सूनच्या ढगांमुळे तापमानात मोठी घट नोंदवली गेली आहे.

ईशान्य भारतात पूरसदृश परिस्थिती

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवामान प्रणालीमुळे समुद्रातून मोठ्या प्रमाणात आर्द्र वारे भारताच्या मुख्य भूभागाकडे सरकत आहेत. या चक्रवाती प्रणालीचा सर्वाधिक परिणाम ईशान्य भारतातील राज्यांवर होत असून, आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. डोंगराळ भागांत सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले धोकादायक पातळीवर वाहू लागले आहेत. अनेक सखल आणि संवेदनशील भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे.

प्रशासन अलर्ट मोडवर

महाराष्ट्रातील मान्सूनचा वेग, बंगालच्या उपसागरातील चक्रवात आणि बिहारमधील वादळी परिस्थिती या तिहेरी हवामान संकटाच्या पार्श्वभूमीवर संबंधित राज्यांतील प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आले आहे. नियंत्रण कक्ष 24 तास सक्रिय ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या काळात कोणतीही मोठी हाणी होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे.

Follow Us