गुवाहाटी एअरपोर्टवर मुंबईचे प्रवासी अडकले; संतप्त प्रवाशांचा विमानतळावरच ठिय्या

गुवाहाटीहून मुंबईला येणारं विमान ऐनवेळी रद्द झाल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली. शनिवारी संध्याकाळी गुवाहाटीहून मुंबईला येणारं अकासा एअरलाइन्सचं विमान ऐनवेळी रद्द करण्यात आलं. त्यानंतर संतप्त प्रवाशांनी एअरपोर्टवरच ठिय्या केलं.

गुवाहाटी एअरपोर्टवर मुंबईचे प्रवासी अडकले; संतप्त प्रवाशांचा विमानतळावरच ठिय्या
Akasa Air
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 22, 2025 | 9:46 AM

गुवाहाटीहून मुंबईला येणारं अकासा एअरलाइन्सचं विमान ऐनवेळी रद्द झाल्याने मुंबईला येणारे शेकडो प्रवासी शनिवारी गुवाहाटी विमानतळावरच अडकून पडले. यावेळी एअरलाइन्सने कोणतीही जबाबदारी न घेतल्याचा आरोप करत संतप्त प्रवाशांनी गुवाहाटी विमानतळावरच ठिय्या आंदोलन केलं. गुवाहाटीहून मुंबईला येण्यासाठी संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटांचं अकासा एअरलाइन्सचं विमान आहे. या विमानाने येण्यासाठी गुवाहाटीला गेलेले मुंबईकर प्रवासी शनिवारी दुपारीच विमानतळावर दाखल झाले. परंतु ऐनवेळी विमान रद्द झाल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली.

सुरुवातीला हवामान खराब आहे, तसंच इतर तांत्रिक कारणं देत विमान उशिराने असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. मात्र रात्री साडेआठ वाजेपर्यंत वाट पाहिल्यानंतरही विमान उपलब्ध होत नसल्याने अखेर प्रवाशांचा संयम सुटला आणि अकासा एअरलाइन्सने त्यांना विमान रद्द झाल्याची माहिती दिली. पायलट आणि केबिन क्रू नसल्यामुळे आता उड्डाण होऊ शकत नसल्याची माहिती त्यांना देण्यात आली. यावर प्रवाशांनी संताप व्यक्त करताच आजची रात्र तुमची हॉटेलमध्ये सोय करतो आणि उद्या सकाळच्या विमानाने तुम्हाला मुंबईला पाठवलं जाईल, असं प्रवाशांना सांगण्यात आलं. मात्र यावरही अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त करत थेट विमानतळातच ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यावर एअरलाइन्स स्टाफ आणि सीआयएसएफने प्रवाशांची समजूत काढत त्यांना सकाळच्या विमानाने जाण्याची विनंती केली आणि सकाळी साडेआठ वाजताच्या विमानाने हे प्रवासी अखेर मुंबईला रवाना झाले.

गेल्या काही दिवसांत विमानप्रवासाबद्दलच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. 12 जून रोजी अहमदाबादहून लंडनसाठी निघालेलं एअर इंडियाचं विमान उड्डाणाच्या अवघ्या काही तासांतच कोसळलं होतं. या दुर्घटनेत विमानातील फक्त एक प्रवासी सोडता बाकी सर्वांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर एअर इंडियाच्या विमानप्रवासाबद्दल इतरही काही तक्रारी समोर आल्या. काही ठिकाणी उड्डाणं अचानक रद्द करण्यात आली. अशातच आता अकासा एअरच्या या घटनेमुळे प्रवाशांच्या मनात संताप निर्माण झाला. उड्डाण रद्द झाल्याची माहिती ठराविक वेळेआधी न दिल्याने आणि ऐनवेळी प्रवाशांची गैरसोय झाल्याने अनेकांनी एअरपोर्टवरच ठिय्या केलं. त्यानंतर अकासा एअरकडून प्रवाशांची सोय हॉटेलमध्ये करण्यात आली.