नरेंद्र मोदी सरकारचा शपथविधीनंतर पहिला सर्वात मोठा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेटची आज पहिली बैठक घेतली. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी सरकारचा हा पहिला निर्णय गरिबांसाठी घेण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींच्या या नव्या कॅबिनेटला आज खाती बहाल करण्यात आली आहेत.

नरेंद्र मोदी सरकारचा शपथविधीनंतर पहिला सर्वात मोठा निर्णय
| Updated on: Jun 10, 2024 | 8:48 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत बैठक घेतली (PM Modi First Cabinet Decisions). या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पहिला सर्वात मोठा निर्णय म्हणजे गरिबांसाठी 3 कोटी घरे बांधण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत 3 कोटी घरे बांधली जाणार आहेत. ग्रामीण आणि शहरी भागात ही घरे बांधली जातील. या घरांमध्ये शौचालय, एलपीजी कनेक्शन, वीज कनेक्शन आणि नळ कनेक्शनही करुन दिले जाणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने गेल्या 10 वर्षांत गरिबांसाठी 4.21 कोटी घरे बांधली आहेत.

निर्णय का घेतला गेला?

भारतामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र असलेल्या ग्रामीण आणि शहरी भागातील कुटुंबांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांच्या गरजा भागवण्यासाठी केंद्र सरकारने आल्या आल्या पहिला हा निर्णय घेतला आहे. गरीब कुटुंबाची ही तातडीच्या घराची गरज पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारचा 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना घरे देण्याचा प्रयत्न असणार आहे. पंतप्रधान मोदींनी निवडणूक प्रचारादरम्यान याची घोषणा केली होती.

शेतकऱ्यांसाठी निधी

दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधानांनी पहिल्या फाइलवर स्वाक्षरी केली. ज्यामध्ये पंतप्रधानांनी स्वाक्षरी करून ‘पीएम किसान निधी’ ची २० हजार कोटी रुपयांची रक्कम जारी केली आहे. या निर्णयाचा फायदा ९.३ कोटी शेतकऱ्यांना होणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. पंतप्रधानांनी आज PM किसान निधीचा 17 वा हप्ता जारी केला आहे. फाइलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, “आमचे सरकार शेतकरी कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 293 जागा मिळाल्या आहेत. रविवारी पंतप्रधान मोदींनी मित्रपक्षांसोबत सरकार स्थापन केले आणि ९ जून रोजी संध्याकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभारी मंत्री आणि 36 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली.