मुंबई : राज्यातील राजकीय नाट्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. शिंदे गटातील आमदार आणि शिवसेना यांच्यातील शाब्दिक चकमक दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे (Presidential election) राष्ट्रपती निवडणुकींची खलबते ही देशाच्या राजधानीत घडत आहेत. असे असताना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुशंगाने होणाऱ्या बैठकीला (NDA) एनडीए ने शिंदे गटालाही निमंत्रण दिले आहे. तर (Shivsena) शिवसेनेच्या खासदारांचा पाठिंबा हा देखील एनडीए च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनाच असणार आहे. त्यामुळे या बैठकीला शिवसेनेलाही निमंत्रण दिले जाते का याकडे लक्ष लागले होते. मात्र, सेनेला अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे निमंत्रण मिळालेले नाही. त्यावरुन खा. संजय राऊत यांनी आपल्या शैलीत यामगची भूमिका आणि कारणही सांगितेले आहे.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुशंगाने शिवसेना खासदारांची आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत एनडीए च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनाच पाठिंबा देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, हा पाठिंबा कुण्या पक्षाला नाहीतर राष्ट्रपतीपदी असलेल्या उमेदवाराला असल्याचे खा. संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय आपण सर्व बाबींकडे तटस्थपणे पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पक्ष कोणताही असो उमेदवाराला पाहून हा निर्णय झाल्याचेही ते म्हणाले. शिवाय शिवसेनेत कुणालाही निर्णय घेता येत नाही. पक्षप्रमुख जो आदेश देतील तोच सर्वांना मान्य असतो याचीही आठवण राऊतांनी यावेळी करुन दिली आहे.
लोकशाहीमध्ये विरोधी गटही तेवढाच महत्वाचा आहे. त्यामुळे बॅलन्स साधला जातो. विऱोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा हे राष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत. असे असले तरी लोकभावना काय आहे हे महत्वाचे. त्यामुळे चार तास सुरु राहिलेल्या बैठकीत खासदारांनी द्रौपदी मुर्मू या एनडीए च्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे लोकभावनेची आणि खासदारांचे मताची कदर करीत हा निर्णय झाला असल्याचे राऊतांनी सांगितले.
शिवसेनेच्या खासदारांचा पाठिंबा हा एनडीए उमेदवाराला असला तरी दिल्ली येथे होणाऱ्या बैठकीचे निमंत्रण सेनेला नाही तर दुसरीकडे शिंदे गटाला बैठकीचे निमंत्रण मिळाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रवक्ते दीपक केसरकर हे बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यावर प्रतिक्रिया न देता आपण सर्व गोष्टींकडे तटस्थपणे पाहत असल्याचे राऊतांनी सांगितले आहे.