Odisha Train Accident : आतापर्यंत 151 मृतदेहांची ओळख पटली, उरलेल्या मृतदेहांबाबत हा निर्णय घेतला

अपघाताच्या प्रसंगी दोन्ही रेल्वेत मिळून सुमारे 2500 प्रवासी प्रवास करीत होते. दुर्घटनेत कोरोमंडळ एक्सप्रेसचे 21 डब्बे पटरीवरून उतरून गंभीररित्या क्षतिग्रस्त झाले होते. प्रचंड उष्णतेने मृतदेह वेगाने खराब होत आहेत, म्हणून आता...

Odisha Train Accident : आतापर्यंत 151 मृतदेहांची ओळख पटली, उरलेल्या मृतदेहांबाबत हा निर्णय घेतला
odisha train
Image Credit source: socialmedia
| Updated on: Jun 05, 2023 | 4:05 PM

बालासोर : ओदिशाच्या बालासोर जिल्ह्यातील तीन रेल्वेच्या विचित्र ( Odisha Train Accident ) अपघातातील मृत्यूमुखी पडलेल्या 275 प्रवाशांपैकी आतापर्यंत 151 मृतदेहांचीच ओळख पटविण्यात यश आले आहे. मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम झाल्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह त्यांच्या गावी पाठविण्याचे काम केले जात आहे. मृतदेहांना त्यांच्या मुक्कामी पोहचविण्याचे कार्य ओदिशा सरकारने नि:शुल्क केले आहे. मात्र, प्रचंड उष्णतेमुळे मृतदेह वेगाने खराब होत चालल्याने स्थानिक प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

दुर्घटनेतील सर्व मृतदेहांची ओळख पटवून त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी ते त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात मिळावेत अशीच राज्य सरकारची इच्छा असल्याचे ओदिशाचे मुख्य सचिव पी.के.जेना यांनी प्रसारमाध्यमांनी सांगितले. जेना पुढे म्हणाले की भीषण उन्हाळ्याने मृतदेह वेगाने खराब होत आहेत. अखेर कायद्यानूसार राज्य अंतिम संस्कारासाठी राज्य सरकार जास्तीत जास्त आणखी दोन दिवसांची वाट पाहू शकते असेही त्यांनी सांगितले.

डीएनएचे नमूने जतन करणार

मृतदेहांचा आकडा मोठा असल्याने मृतदेहाची ओळख पटविणे खूपच जिकीरीचे काम बनले आहे. त्यामुळे मृतदेहांचे डीएनए नमूने घेतले जातील. तसेच मृतदेहांची छायाचित्रे सरकारी वेबसाईटवर अपलोड केली जातील असे मुख्य सचिव जेना यांनी सांगितले. एनडीआरएफच्या नऊ टीम, ओदिशा डिझास्टर रेपिड एक्शन फोर्सच्या पाच तुकड्या, अग्निशमन दलाच्या 24 टीम रेस्क्यू ऑपरेशनमध्ये गुंतल्या होत्या. रुग्णालयात रात्रीच्या वेळी सर्जरीची व्यवस्था केली होती, शंभरहून अधिक पॅरामेडीकल स्टाफची तैनाती त्यासाठी करण्यात आली होती.

2500 प्रवासी प्रवास करीत होते

अपघाताच्या प्रसंगी दोन्ही रेल्वेत मिळून सुमारे 2500 प्रवासी प्रवास करीत होते. दुर्घटनेत कोरोमंडळ एक्सप्रेसचे 21 डब्बे पटरीवरून उतरून गंभीररित्या क्षतिग्रस्त झाले होते. रेल्वेने या अपघात चालकांची चूक किंवा वेग जबाबदार नसून कथित सिस्टीमची तोडफोड आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकींग प्रणालीशी केलेला संशयास्पद बदल कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले आहे.

275 प्रवाशांचा मृत्यू

ओदिशाच्या बालोसोर जिल्ह्यात 2 जूनच्या रात्री शालीमार – चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरू-हावडा सुपरफास्ट आणि एक मालगाडी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 275 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 1,175 जण जखमी झाले आहेत. जखमींवर सोरो, बालासोर आणि कटक येथील विविध रुग्णालयात उपचार केले जात आहेत.