
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ची मोहीम भारतीय सैन्याने आखली होती. ७ मे रोजी भारतीय सैन्याने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. त्यातच अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर काल सायंकाळी पाच वाजता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी युद्धविराम जाहीर केला. मात्र तीन तासांतच पाकने शस्रबंदीचे उल्लंघन केले.त्यानंतर आज सायंकाळी तिन्ही सेनादलाच्या प्रमुखांनी पीसी घेत पाकिस्तानची चांगलीच पाचर मारली.
दहशतवादी आणि त्यांचे अड्डे नष्ट करणे हेच या कारवाईचे स्पष्ट उद्दिष्ट होते. आम्ही सीमेपलीकडील दहशतवादी तळांची नीट माहीती घेतली होती. परंतु तेथील अतिरेक्यांचे अड्डे आणि ठिकाणे आधीच रिकामी करण्यात झाली होती, परंतु आम्हाला अशी 9 लपण्याची ठिकाणे आढळली जी आमच्या गुप्तचर एजन्सींनी सक्रिय म्हणून घोषित केली होती. यातील काही लपण्याची ठिकाणे पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये होती आणि काही पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात होती – जसे की मुरीदके, जे कसाब आणि डेव्हिड हेडली सारख्या दहशतवाद्यांशी संबंधित आहे असे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले.
आमच्या हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले, यात युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदस्सीर अहमद सारखे मोस्ट वॉण्टेड अतिरेक्यांना ठार करणे आमचे लक्ष्य होते. हे दहशतवादी इंडियन एअरलाईन्स आयसी – ८१४ अपहरण आणि पुलवामाहल्ल्यात सहभागी होते. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर युद्धबंदीचे उल्लंघन केले आणि गुरुद्वारासारख्या नागरी भागांनाही त्यांच्याकडून लक्ष्य करण्यात आले आहे असेही लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले.