
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला होता. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानला चोख प्रत्यतुत्तर दिले जावे अशी मागणी सातत्याने होत होती. आता अखेर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानातील ९ ठिकाणी एअर स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात भारताने पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांना उद्धवस्त केले. भारताकडून करण्यात आलेल्या या एअर स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. हे नाव देण्यामागचे कारण काय याबद्दल आपण जाणून घेऊया.
पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 25 भारतीय नागरिक आणि एका नेपाळी नागरिकांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले होते. यावेळी महिला पर्यटकांऐवजी त्यांच्या पतींना लक्ष्य केले गेले आहे. जेणेकरुन त्यांच्या मागण्या पूर्ण होऊ शकतील. या क्रूर कृत्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाने जोरदार मोहीम राबवली. या नावामागे केवळ लष्करी संकेत नसून, दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा निर्धार होता. ज्या सिंदूराला त्यांनी लक्ष्य केले, त्याच सिंदूराच्या नावाने भारताने ही कारवाई केली. ही कारवाई अत्यंत थेट आणि अचूक ठिकाणी होती.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा महिलांना सोडून त्यांच्या पतींना मारलं होतं. महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होतं. त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या पतींवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी या मिशनचं नाव ‘मिशन सिंदूर’ ठेवण्यात आले. भारतीय सैन्य दलाने या मिशन अंतर्गत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. या माध्यमातून भारताने दहशतवाद्यांना धडा शिकवला आहे. यापुढे दहशतवाद्यांनी कोणत्याही महिलेचे कुंकू पुसण्याची हिंमत केली तर ते युद्धासारखं मानलं जाईल हा स्पष्ट संदेश या प्रत्युत्तरातून दिला आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्धवस्त केले. हे हल्ले पाकिस्तानी लष्करी किंवा नागरी वस्त्यांवर नव्हते तर केवळ दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण आणि नियोजन केंद्रांवर होते. भारताने या संपूर्ण कारवाईत कमालीचा संयम आणि संतुलित लष्करी रणनीतीचा अवलंब केला. ज्या ठिकाणांहून भारतावर हल्ला करण्याची योजना आखली जाते, तेच दहशतवादी तळ नष्ट करणे हाच या ऑपरेशनचा मुख्य उद्देश होता.