Petrol Diesel Price : लवकरच पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सरकारकडून मोठी अपडेट समोर
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी चढ-उतार होऊनही भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर बऱ्याच अंशी स्थिर राहिले असं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांबाबतच्या प्रश्नांना उत्तर देताना हरदीप पुरी यांनी सांगितलं.

अमेरिका आणि इराणमधील तणाव जवळपास निवळल्यामुळे आणि ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मधील वाहतूक पुन्हा विनाअडथळा सुरू झाल्यामुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींत चढ-उतार दिसू लागले आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळेल अशी लोकांना अपेक्षा आहे. भारतातही इंधनाचे दर कमी होतील का असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे. मात्र आता या संदर्भात सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. सध्याच्या परिस्थितीत इंधनाचे दर कमी करण्याचे कोणतेही ठोस कारण नाही, असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलं आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांबाबतच्या प्रश्नांना उत्तर देताना हरदीप पुरी यांनी सांगितलं की, जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी चढ-उतार होऊनही भारतातील दर बऱ्याच अंशी स्थिर राहिले आहेत. गेल्या चार वर्षांत पेट्रोलच्या दरात केवळ 5.58 टक्के आणि डिझेलच्या दरात 6.23 टक्के वाढ झाल्याचं त्यांनी नमूद केलं.
पेट्रोल- डिझेलच्या किमती कमी होणार नाहीत
सरकारी ऑईल विपणन कंपन्या (OMCs) अजूनही सुमारे 2.18 लाख कोटी रुपयांची एकत्रित तूट (नुकसान) भरून काढत आहेत. शिवाय, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव खूप जास्त असताना खरेदी केलेला इंधनाचा साठाही या कंपन्यांकडे अजून शिल्लक आहे. अशा परिस्थितीत, सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणे शक्य नाही, असं केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं.
काय म्हणाले हरदीप पुरी?
” त्यामुळेच, सध्याच्या काळात इंधनाचे दर कमी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ” असं पुरी म्हणाले. आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारातील अस्थिरतेच्या परिणामांपासून सरकारने भारतीय ग्राहकांना बऱ्याच अंशी सुरक्षित ठेवले आहे, असंही केंद्रीय मंत्र्यांनी पुढे नमूद केलं. त्या काळातही देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहिला होता असं त्यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (Strait of Hormuz) परिसरातील तणावाचा संदर्भ देत सांगितलं.
देशातील कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधन संपल्याची परिस्थिती उद्भवली नाही. या संकटकाळातही देशभरातील सुमारे 1.07 लाख पेट्रोल पंप सुरळीतपणे कार्यरत होते, असं त्यांनी स्पष्ट केलं. जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतींमधील चढ-उतारामुळे निर्माण झालेले बहुतांश आर्थिक भार सरकारने स्वतः सोसले, ज्यामुळे सामान्य जनतेवर कोणताही अतिरिक्त बोजा पडला असंही केंद्रीय मंत्री पुरी म्हणाले.