PM मोदी सातव्यांदा फ्रान्सच्या दौऱ्यावर, हा देश भारतासाठी का आहे खास?

India France Relation : भारत आणि फ्रान्स यांच्यातील मैत्री आज जगासाठी एक आदर्श मानली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत, डॉ. मनमोहन सिंग असोत, इंदिरा गांधी असोत किंवा पंडित जवाहरलाल नेहरू. या सर्वांनी फ्रान्सला खास महत्त्व दिलेले आहे.

PM  मोदी सातव्यांदा फ्रान्सच्या दौऱ्यावर, हा देश भारतासाठी का आहे खास?
PM Modi France Visit
Image Credit source: X
| Updated on: Jun 14, 2026 | 7:48 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर गेले आहेत, या दौऱ्यात काही महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील मैत्री आज जगासाठी एक आदर्श मानली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत, डॉ. मनमोहन सिंग असोत, इंदिरा गांधी असोत किंवा पंडित जवाहरलाल नेहरू. सर्व भारतीय पंतप्रधानांनी फ्रान्सला परराष्ट्र धोरणात विशेष महत्त्व दिले आहे. इंदिरा गांधी यांनी तर पंतप्रधान झाल्यानंतर पहिला परदेश दौरा फ्रान्सचाच केला होता. मात्र, नरेंद्र मोदी हे सर्वाधिक वेळा फ्रान्सला भेट देणारे पंतप्रधान ठरले आते. या मागे अनेक आर्थिक आणि कूटनीतिक कारणे आहेत. याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारतासाठी फ्रान्स इतका महत्त्वाचा का?

अटींशिवाय पाठिंबा : 1998 मध्ये भारताने अणुचाचण्या केल्यानंतर अमेरिका आणि अनेक देशांनी भारतावर निर्बंध लादले होते. मात्र, त्या कठीण काळात फ्रान्सने भारताला पाठिंबा दिला होता. फ्रान्सने भारतावरील निर्बंधांना विरोध केला होता.

संरक्षण क्षेत्रातील सहकार्य : भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणात फ्रान्सची महत्त्वाची भूमिका आहे. राफेल लढाऊ विमाने हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. याशिवाय, ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत संरक्षण तंत्रज्ञान हस्तांतरणासाठीही फ्रान्स सकारात्मक भूमिका घेत आहे.

अवकाश आणि विज्ञान क्षेत्र : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि फ्रान्सची अंतराळ संस्था यांच्यात दशकांपासून घनिष्ठ सहकार्य आहे. भारताचे अनेक उपग्रह फ्रान्सच्या एरियन रॉकेटद्वारे अवकाशात पाठवण्यात आले आहेत. सध्या दोन्ही देश मंगळ आणि शुक्र ग्रह मोहिमांवर संयुक्तपणे काम करत आहेत.

अणुऊर्जा प्रकल्प : भारताच्या वाढत्या ऊर्जा गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्रातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर फ्रान्सच्या सहकार्याने काम सुरू आहे. स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा निर्मितीतही फ्रान्स भारताला मदत करत आहे.

जागतिक स्तरावर फ्रान्सचे महत्त्व

फ्रान्स हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा कायम सदस्य आहे. भारताला सुरक्षा परिषदेचे कायम सदस्यत्व मिळावे यासाठी फ्रान्स सातत्याने पाठिंबा देत आला आहे. पाकिस्तान किंवा चीनने आंतरराष्ट्रीय मंचावर भारताविरोधात भूमिका घेतल्यास फ्रान्स अनेकदा भारताच्या बाजूने ठामपणे उभा राहिलेला आहे. त्यामुळे फ्रान्स हा देश भारतासाठी खूप महत्त्वाचा देश आहे.

आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध

युरोपमध्ये फ्रान्स हा भारताचा महत्त्वाचा व्यापार भागीदार आहे. दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी फ्रान्समध्ये जातात. पर्यटन, योग, आयुर्वेद आणि भारतीय खाद्यसंस्कृतीमुळे फ्रान्समध्ये भारताची लोकप्रियता वाढली आहे.

होरायझन 2047

भारत आणि फ्रान्स यांनी पुढील 25 वर्षांसाठी होरायझन 2047 हा रोडमॅप तयार केला आहे. यात अवकाश संशोधन, हिंदी महासागरातील सुरक्षा, पर्यावरण संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नव्या तंत्रज्ञानातील सहकार्याचा समावेश आहे. ही केवळ दोन सरकारांमधील नव्हे, तर दोन लोकशाही मूल्यांवर आधारित संस्कृतींमधील मैत्री मानली जाते.

पंतप्रधान मोदी सात वेळा फ्रान्सला का गेले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वेळा फ्रान्सचा दौरा करून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. भारत-फ्रान्स सामरिक भागीदारीची 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी बॅस्टिल डे परेडमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग घेतला होता. तसेच राफेल लढाऊ विमाने आणि स्कॉर्पीन पाणबुड्यांसारख्या महत्त्वाच्या संरक्षण करारांवर सातत्याने चर्चा करण्यासाठी मोदी फ्रान्सला जात आहेत. तसेच इतरही कामांसाठी मोदी अनेकदा फ्रान्सला गेलेले आहेत.

नेहरू, इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग यांचेही फ्रान्स दौरे

पंडित जवाहरलाल नेहरू : भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू यांनी जानेवारी 1951 मध्ये फ्रान्सचा दौरा केला होता. त्या वेळी पुदुच्चेरीच्या शांततापूर्ण हस्तांतरणासह विज्ञान क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा झाली होती. त्यांनी 1962 मध्येही फ्रान्सला भेट दिली होती.

इंदिरा गांधी : इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात अणुऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्याची पायाभरणी झाली. त्यांनी तीन अधिकृत फ्रान्स दौरे केले. विशेष म्हणजे 1966 मध्ये पंतप्रधान म्हणून त्यांचा पहिलाच परदेश दौरा फ्रान्सचा होता.

डॉ. मनमोहन सिंग : मनमोहन सिंग यांनी आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात चार वेळा फ्रान्सला भेट दिली. 2008 मध्ये भारत-फ्रान्स नागरी अणुऊर्जा करार त्यांच्या कार्यकाळात झाला, जो भारतासाठी मोठी कूटनीतिक आणि ऊर्जा क्षेत्रातील उपलब्धी मानली जाते.

Follow Us