भारत आणि श्रीलंका यांच्यात आता कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच झाली होती. या संघात जसप्रीत बुमराहचे कमबॅक पाहून चाहत्यांना सुखद धक्का मिळाला होता. पण हा सुखद धक्का काही जास्त काळ टिकला नाही. श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आहे. संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज, जसप्रीत बुमराह, या दौऱ्यातून बाहेर झाला आहे. बुमराहची संघात निवड ही फिटनेसवर आधारित होती. आता तो अजून फिट झाला नाही म्हणून त्याची निवड आता पुन्हा लांबणीवर गेली आहे. आता बुमराहच्या जागी कोणता खेळाडू खेळणार याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. बीसीसीआयने आता नाव जाहीर केले आहे.
इंग्लंडमधील एकदिवसीय मालिकेदरम्यान
बुमराहला दुखापत झाली होती आणि त्यानंतर तो बंगळूरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दाखल झाला होता. तो पूर्णपणे बरा न झाल्याने त्याला दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे, “इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान झालेल्या डाव्या गुडघ्याच्या दुखापतीतून जसप्रीत बुमराह पूर्णपणे बरा झालेला नाही आणि त्याला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले आहे.” जम्मू आणि काश्मीरच्या आकिब नबीची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने सोमवारी एक निवेदन प्रसिद्ध करून ही घोषणा केली.
नबीच्या नावाची घोषणा करताना बीसीसीआयने लिहिले, “पुरुष निवड समितीने बुमराहच्या जागी आकिब नबीची निवड केली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या या गोलंदाजाचा भारतीय संघात समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे.” भारत श्रीलंका दौऱ्यावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिला सामना 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान गॉल येथे खेळला जाईल. दुसरी कसोटी 23 ते 27 ऑगस्ट दरम्यान कोलंबो येथे होईल. त्यापूर्वी, भारतीय संघ 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान तीन दिवसीय सराव सामना खेळेल. भारतीय संघ 4 तारखेला श्रीलंकेसाठी रवाना होईल.
आकिब नबी देशांतर्गत क्रिकेटमधील एक गाजलेले नाव आहे. या 29 वर्षीय खेळाडूने 43 प्रथम-श्रेणी सामने खेळले असून, 71 डावांमध्ये 18.63 च्या प्रभावी सरासरीने 164 बळी घेतले आहेत. त्याची सर्वोत्तम खेळी 24 धावांत 7 बळी घेण्याची आहे. आकिब फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये योगदान देण्यास सक्षम आहे. प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर दोन अर्धशतकांसह 999 धावा आहेत.