महाराष्ट्रातही राबवला जातोय सत्ताबदलाचा ‘बिहारी पॅटर्न’? सेना-भाजपचं सरकार निश्चित? काय घडतंय? वाचा सविस्तर

| Updated on: Jul 06, 2021 | 2:13 PM

मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराची जेवढी चर्चा महाराष्ट्रात आहे त्यापेक्षा जास्त चर्चा ठाकरे सरकारच्या अस्तित्वाची आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला टाळलेल्या पत्रकार परिषदेमुळे तर चर्चेला आणखीनच उधान आलंय. (maharashtra politics)

महाराष्ट्रातही राबवला जातोय सत्ताबदलाचा बिहारी पॅटर्न? सेना-भाजपचं सरकार निश्चित? काय घडतंय? वाचा सविस्तर
political leader
Follow us on

मुंबई: मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराची जेवढी चर्चा महाराष्ट्रात आहे त्यापेक्षा जास्त चर्चा ठाकरे सरकारच्या अस्तित्वाची आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला टाळलेल्या पत्रकार परिषदेमुळे तर चर्चेला आणखीनच उधान आलंय. पण नेमकं काय घडतंय? राजकीय पंडीतांना असं वाटतंय की, महाराष्ट्रात सत्ताबदलाचा ‘बिहारी पॅटर्न’ राबवला जातोय. पण काय पॅटर्न आहे आणि खरंच नितीशकुमारांनी जे केलं होतं तसच उद्धव ठाकरे महाराष्ट्रात करणार का? (PM Modi’s Cabinet expansion a chance for Shiv Sena?, read what will happened in maharashtra politics)

काय आहे सत्ताबदलाचा ‘बिहारी पॅटर्न’?

2015 ला बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. आरजेडीचे लालू प्रसाद यादव आणि जेडीयूच्या नितीशकुमार यांनी महागठबंधन तयार केलं. निवडणूक लढवली आणि जिंकले. नितीशकुमार मुख्यमंत्री झाले, आरजेडीचे तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री. दीड एक वर्ष कारभार चालू राहीला. पण नितीशकुमार अस्वस्थ होते. कारण आरजेडी म्हणजे भ्रष्टाचार, त्यांच्यावर असलेल्या केसेसची चर्चा सुरुच होती. त्यातच आरजेडी म्हणजेच लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव यांनी नितीशकुमारांवर उघड उघड कुरघोडी करायला सुरुवात केली. त्यातूनच दोन्ही पक्षातले नेते, मंत्र्यांमध्ये खटके उडायला लागले. नितीशकुमारांना उलट भाजपची साथ बरी वाटायला लागली. दरम्यानच्या काळात ईडी, सीबीआय बिहारमध्ये सक्रिय झाले. त्यांनी लालू यादव, त्यांच्या मुली, कुटुंबियांवर रेड पडायला लागले. त्यातून नितीशकुमार यांची प्रतिमाही मलिन व्हायला लागली. शेवटी त्यांनी लालू यादव यांच्यावर भ्रष्टाचार आणि प्रशासनात अडथळे आणल्याचा ठपका ठेवत सरकारमधून बाहेर पडले. काही तासात त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली आणि नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले तर भाजपचे सुशील मोदी उपमुख्यमंत्री. अशा पद्धतीनं नितीशकुमारांच्या साथीदारावर एवढे हल्ले चढवले की, त्यांनी आरजेडीची साथ सोडली आणि भाजपसोबत सरकार बनवलं. यालाच सत्ताबदलाचा बिहारी पॅटर्न म्हटला जातो.

महाराष्ट्रातही बिहार सारखच घडतंय का?

महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे यांच्या सरकारला आता वर्ष लोटून गेलंय. हिंदुत्व आणि करप्शनच्या मुद्यावर राज्यातल्या भाजप नेत्यांनी शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केलाय. त्यातच केंद्रातून ईडी सक्रिय झालीय. शिवसेनेचे मंत्री अनिल परब, आमदार प्रताप सरनाईक हेही ईडीच्या रडारवर आहेत. किरिट सोमय्या रोज एक नवा आरोप, नव्या मंत्र्यांवर किंवा नेत्यावर करतायत. फक्त शिवसेनाच नाही तर राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही ईडी छापे टाकतंय. त्यातूनच अनिल देशमुखांना घरी जावं लागलं. अजित पवारांचं सध्या जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरण चर्चेत आहे आणि ते ईडीनं सील केलंय. परिणामी राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन केली जातेय ज्याचा फटका शिवसेनेलाही बसतोय. एक तर शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही आघाडीच ‘अनैसर्गिक’ असल्याचा दावा, आरोप भाजपा करतंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही कुठल्याही क्षण सत्ता बदलाचा ‘बिहारी पॅटर्न’ अस्तित्वात येईल अशी चर्चा आहे. या पॅटर्ननुसार जसे नितीशकुमार लालू यादव यांना सोडून भाजपसोबत आले तसेच उद्धव ठाकरे हे शरद पवारांना सोडून भाजपसोबत येतील अशी चर्चा आहे.

कसं असेल पुढचं सरकार?

जे बिहारमध्ये महागठबंधनचं झालं तेच महाराष्ट्रात महाआघाडीचं होणार. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेच असतील. भाजपाला दोन उपमुख्यमंत्रीपद दिले जातील. फडणवीसांना केंद्रात पाठवलं जाईल अशा फॉर्म्युल्याची चर्चा गेल्या काही दिवसात जोरदार आहे. खुद्द फडणवीसांनी मात्र मी केंद्रात जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यानंतरही ही चर्चा काही थांबलेली नाही. मोदी सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार आहे. त्यातही सेनेला स्थान दिलं जाईल असं वृत्त काही इंग्रजी वर्तमानपत्रांनी दिलंय. त्यापार्श्वभूमीवर तर महाराष्ट्रात सत्तेचा नवा डाव खेळला जातोय असं दिसतंय. (PM Modi’s Cabinet expansion a chance for Shiv Sena?, read what will happened in maharashtra politics)

 

संबंधित बातम्या:

आठ राज्यपाल बदलले, केंद्रीय मंत्री आता कर्नाटकचे गव्हर्नर, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला वेग

नारायण राणेंना तातडीने दिल्लीला बोलावणं, केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान निश्चित

येत्या 7 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार?, राणे, हिना गावित यांचा समावेश होणार?

(PM Modi’s Cabinet expansion a chance for Shiv Sena?, read what will happened in maharashtra politics)