मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मोठा उलटफेर; 2 मोठ्या चेहऱ्यांची होणार एन्ट्री? भाजप एकाच दगडात मारणार 2 पक्षी
Modi Cabinet Expansion : केंद्रीय मंत्रिमंडळात पुढील आठवड्यात फेरबदल होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात दोन चेहऱ्यांना संधी मिळण्याची चर्चा आहे.

मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात पुढील आठवड्यात विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मंत्रिमंडळात मेरठचे भाजप खासदार अरुण गोवल आणि आरबीआयचे माजी गवर्नर शक्तिकांत दास यांना स्थान मिळण्याची जोरदार चर्चा आहे. दोघांच्या नावामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
प्रसिद्ध मालिका ‘रामायण’मध्ये भगवान श्रीरामाची भूमिका साकारल्याने घराघरात ओळख निर्माण केलेल्या अरुण गोविल यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्याची चर्चा आहे. एकीकडे अयोध्येतील राम मंदिरात आर्थिक गैरव्यवहार आढळल्याने वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भाजपने नवा डाव टाकल्याची चर्चा आहे. या राजकीय डावाचा आगामी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिणाम होणार का, हे पाहावे लागेल.
उत्तर प्रदेशात २०२७ साली विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याचदरम्यान राम मंदिरात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघड झालं आहे. त्यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची भीती सत्ताधाऱ्यांना लागल्याचे बोलले जात आहे. या परिस्थितीत मेरठचे खासदार अरुण गोविल यांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्याची चर्चा सुरू आहे. अरुण गोविल हे केवळ अभिनेते म्हणून नाही, तर त्यांच्या ‘रामायण’ मालिकेतील ‘भगवान राम’ म्हणून असलेल्या प्रतिमेचा वापर केला जाऊ शकतो. राम मंदिरातील गैरव्यवहार प्रकरणामुळे मलिन झालेली सरकारची प्रतिमा पुसण्यासाठी अरुण गोविल यांच्या स्वच्छ प्रतिमेचा वापर केला जाऊ शकतो, असे राजकीय तज्ज्ञ म्हणत आहेत.
समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्ष आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोविल यांना संधी दिल्यास त्यांच्यावर थेट टीका करणे विरोधकांना अवघड जाऊ शकते. अरुण गोविल यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे विरोधक सावध भूमिका घेण्याची शक्यता आहे. अरुण गोविल यांची कॅबिनेटमध्ये साधारण एन्ट्री नसून आगामी निवडणुकीच्या तोंडावर ‘रामबाण’ उपाय असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
अरुण गोविल यांच्यासहित कॅबिनेटमध्ये आरबीआयचे माजी गवर्नर शक्तिकांत दास यांच्याही नावाची चर्चा आहे. शक्तिकांत दास यांना केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट पदाचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. इराण- अमेरिका-इस्त्रायलच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशाला आर्थिक धोरणांना नवीन दिशा देण्यासाठी त्यांची एन्ट्री होण्याची चर्चा आहे . काही दिवसांपूर्वी जॉर्ज कुरियन यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तर रवनीत सिंग बिट्टू यांचा राज्यसभेतील कार्यकाळ देखील संपला. या नेत्यांना भाजपकडून पक्षातील संघटनात्मक जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.