नरेंद्र मोदी यांच्याविरोधात गांधी घराण्यातील ‘ही’ व्यक्ती लढणार; 2024ची निवडणूक मोदींना जड जाणार?

2024ची लोकसभा निवडणूक भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी जड जाण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत मोदींविरोधात थेट गांधी घराण्यातील व्यक्तीलाच मैदानात उतरवलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

नरेंद्र मोदी यांच्याविरोधात गांधी घराण्यातील ही व्यक्ती लढणार; 2024ची निवडणूक मोदींना जड जाणार?
pm narendra modi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 19, 2023 | 6:40 AM

नवी दिल्ली | 19 ऑगस्ट 2023 : इंडिया आघाडीपासून ते एनडीएपर्यंत आणि कोणत्याही आघाडीत नसलेल्या राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत किती जागा जिंकायच्या याचं टार्गेटही ठरवलेलं आहे. मात्र, काँग्रेसनेही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान देण्याचं ठरवलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात वाराणासीतून गांधी कुटुंबातील व्यक्तीच उभा करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. गांधी घराण्यातील जी व्यक्ती वाराणासीतून लढणार आहे, त्या व्यक्तीची ही पहिलीच निवडणूक असणार आहे. त्यामुळे गांधी घराण्यातील या व्यक्तीला मतदारांची सहानुभूती मिळू शकते. त्यामुळे मोदी यांच्यासाठी 2024ची लोकसभा निवडणूक जड जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष अजय राय यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे पुन्हा एकदा अमेठीतून लढणार असल्याचं अजय राय यांनी सांगितलं. त्यामुळे राहुल गांधी यांची लढत अमेठीच्या विद्यमान खासदार स्मृती ईराणी यांच्याशी होणार आहे. तर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या वाराणासीतून निवडणूक लढणार आहेत.

प्रियंका गांधी यांची थेट लढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात होणार आहे. प्रियंका गांधी यांची ही पहिलीच सार्वजनिक निवडणूक असणार आहे. तर मोदी हे वाराणासीतून तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे वाराणासीतून प्रचंड मोठी टफ फाईट होईल. मोदींसाठी ही निवडणूक पाहिजे तेवढी सोपी नसेल असं जाणकारांचं म्हणणं आहे.

जिवाची बाजी लावू

प्रियंका गांधी वाराणासीतून लढतील. त्यांच्यासाठी एक एक कार्यकर्ता जिवाची बाजी लावून प्रचार करतील. आम्ही त्यांचं संपूर्ण समर्थन करणार आहोत, असं अजय राय यांनी म्हटलं आहे. अजय राय यांनी 2014 आणि 2019मध्ये मोदींविरोधात वाराणासीतून निवडणूक लढवली आहे.

इंडिया आघाडीची खेळी काय?

काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांना मोदींविरोधात वाराणासीतून उतरवण्यामागे इंडिया आघाडीची मोठी खेळी असल्याचं सांगितलं जात आहे. प्रियंका गांधींना वाराणासीतून उतरवल्यास ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरेल. मोदींसमोर जिंकण्याचं मोठं आव्हान असेल. त्यामुळे मोदींना मतदारसंघात अधिकाधिक वेळ द्यावा लागेल. त्यांना इतर राज्यातील दौरे आणि सभांना कमी वेळ द्यावा लागेल. मोदींना खिंडीत गाठण्यासाठीच आणि वाराणासीतून गुंतवून ठेवण्यासाठीच प्रियंका गांधी यांना वाराणासीतून लढवलं जात असल्याचं सांगण्यात येत आहे.