Bus Accident : भीषण अपघात, पुलावरुन थेट नाल्यात कोसळली बस, आठ प्रवाशांचा मृत्यू, चिंताजनक प्रवाशांची संख्या जास्त
Bus Accident : एका खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. बस पुलावरुन थेट नाल्यात कोसळली. बसमध्ये किमान 50 प्रवासी असल्याची माहिती आहे.

एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली बस पुलावरुन थेट नाल्यात कोसळली. या बसमध्ये किमान 50 प्रवासी असल्याची माहिती आहे. पंजाबच्या बठिंडा येथे हा भीषण अपघात झाला आहे. बठिंडाच्या जीवन सिंह वाला येथे हा भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली बस थेट पुलावरुन नाल्यात कोसळली. प्रशासन आणि स्थानिक लोकांनी बसच्या काचा तोडून प्रवाशांना बाहेर काढलं.
बठिंडा-शार्दुलगढ़ मार्गावर या खासगी कंपनीच्या प्रवासी बसची वाहतूक सुरु होती. पुलावरुन बस खाली कोसळली. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झालाय. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलय. बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. हा अपघात कसा झाला, ते अजून स्पष्ट झालेलं नाही. बठिंडाचे एसएसपी अवनीत कोंडल दुर्घटनास्थळी पोहोचले आहेत.
किती प्रवाशांची प्रकृती चिंताजनक?
अपघाताच्यावेळी पाऊस सुरु असावा, त्याचवेळी बसचा वेग जास्त होता, त्यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. नेमका अपघात कसा झाला, हे अजून समजू शकलेलं नाही. बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. 24 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
‘ऐकून मी स्तब्ध’
तलवंडी साबोमधील आपचे आमदार बलजिंदर कौर यांनी दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं. या दुर्देवी अपघाताबद्दल ऐकून मी स्तब्ध आहे, असं ते म्हणाले. बलजिंदर कौर म्हणाले की, “माझं डीसी शौकत अहमद पारे यांच्याशी फोनवरुन बोलणं झालय. जवळपास सर्वच प्रवाशांना बाहेर काढण्यात आलय”
