Rahul Gandhi : राहुल गांधींचा भाजप-RSS वर जोरदार हल्लोबाल; जन्म ते मृत्यू…देशात दलितांसोबत भेदभाव, दिले हादरवणारे पुरावे
राहुल गांधी यांनी भाजप आणि रास्व संघावर गंभीर आरोप केला आहे. देशातील दलितांसोबत होणाऱ्या भेदभावाची मालिका राहुल गांधी यांनी मांडली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर गंभीर आरोप केला आहे. भारतात भाजप नेते दलितांसोबत भेदभाव करत आहेत. दलितांना जन्मापासून मृत्यूपर्यंत भेदभावाचा सामना करावा लागत आहे. दलित व्यक्ती त्याच्या कार्यक्षेत्रात यशस्वी झाल्यानंतरही त्याच्यावरील अत्याचार थांबत नाही. दलित विद्यार्थ्यांकडून शाळेत टॉयलेट स्वच्छ करून घेतले जातात. तर भाजप नेत्यांकडून राजकारणात दलित नेत्यांसोबत दुजाभाव केला जातो, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमातून दलितांवर होणाऱ्या अत्याचाराची मालिका सांगितली. यावेळी राहुल गांधी यांनी पुरावे देखील दिले. राहुल गांधी म्हणाले, ‘ देशात मनुस्मृती आणि संविधान या दोन विचारांमध्ये लढाई सुरू आहे. संविधानानंतर मनूस्मृतीचं पालन करण्याची बाब बेकायदेशीर आहे. शाळेत दलित विद्यार्थ्यांकडून टॉयलेट स्वच्छ केले जात आहेत. साफसफाई करून घेतली जाते. लहान मुले पाहत आहेत. शाळेत काही जणच झाडू मारताना दिसतात. हे वास्तव आहे. दलितांना विहिरीवर पाणी पिऊ दिलं जात नाही. चहाच्या दुकानातही भेदभाव पाहायला मिळतो. चहाच्या दुकानावर दोन प्रकारचे कप असतात. एक कप पुन्हा वापरला जाऊ शकतो. तो काचेचा कप असतो. तर दुसरा पेपर कप असतो. हा कप फेकला जातो. पेपर कप हा दलितांसाठी वापरला जातो. तर काचेचा कप दुसऱ्या लोकांसाठी वापरला जातो’.
‘वरातीत आनंदाच्या दिवशी नवरदेव घोड्यावर चढल्यानंतर हेल्मेट घालतो. दगडफेक केली जाते. हे भारताचं वास्तव आहे. हे उत्तर प्रदेश, उत्तर भारताचं वास्तव आहे. या गोष्टी गावात आणि शहरातही पाहायला मिळतात. दलित व्यक्ती यशस्वी झाल्यानंतरही त्याच्यावर अत्याचार केला जातो. दररोज लाखो लोकांवर होतो. परंतु दलित पुढे गेल्यानंतरही त्याच्यावर अत्याचार होतो. अलवरमध्ये एका दलित नेत्याने मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाजप नेत्याने शुद्धिकरण केले होते. ज्ञानदेव आहूजा असे भाजप नेत्याचे नाव, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
‘काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांचं आयुष्य राजकारण, लोकसेवेसाठी वाहिलं आहे . ते रामलीला मैदानात गेले होते. त्यावेळी त्यांच्या रॅलीनंतर शुद्धीकरण करण्यात आलं होतं. बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री मांझी हे मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मंदिरातून दर्शन करून आल्यानंतर मंदिराचं शुद्धीकरण करण्याचा प्रकार करण्यात आला होता. भाजप आणि आरएसएसचे लोक हे करतात. हा गुन्हा आहे. संविधानानुसार हा गुन्हा आहे, असे राहुल गांधी पुढे म्हणाले.