पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पहिली पसंती, दुसऱ्या क्रमांकावर राहुल गांधी, तिसरं नाव वाचून हैराण व्हाल
Vijay PM Race : तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या समर्थकांनी काँग्रेस आणि राहुल गांधींसमोर एक नवे आव्हान उभे केले आहे. कारण आता विजय यांच्या नावाची चर्चा पंतप्रधानपदासाठी होऊ लागली आहे.

अलिकडेच पार पडलेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत टीव्हीके पक्षाने शानदार कामगिरी केली होती. तामिळनाडूमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर टीव्हीके प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी आवश्यक बहुमताची जुळवाजुळव करत तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. विजय यांच्या शपथविधीची चर्चा संपूर्ण देशात रंगली होती. या शपथविधीला काँग्रेस नेते राहुल गांधी हेही हजर होते. मुख्यमंत्री बनल्यानंतर विजय आणि राहुल गांधी यांनी सेल्फीही घेतली होती. या सेल्फीच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांसह दोन्ही पक्षांमधील मैत्रीचे उदाहरण दिले जात होते. मात्र, या घटनेच्या चार महिन्यांनंतर मुख्यमंत्री विजय यांच्या समर्थकांनी काँग्रेस आणि राहुल गांधींसमोर एक नवे आव्हान उभे केले आहे. कारण आता विजय यांच्या नावाची चर्चा पंतप्रधानपदासाठी होऊ लागली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणारे विजय यांना राजकारणात येऊन फारसा काळ झालेला नाही. मात्र, एका नव्या सर्व्हेमुळे त्यांचे नाव देशातील संभाव्य पंतप्रधानांच्या चेहऱ्यांच्या चर्चेत आले आहे. इंडिया टुडे-सीव्होटरच्या ‘मूड ऑफ द नेशन’ सर्व्हेमध्ये 9.2 टक्के लोकांनी विजय यांना देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या यादीत विजय यांच्यापेक्षा नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी पुढे आहेत.
सर्व्हेमध्ये पीएम मोदी सर्वात पुढे
ऑगस्ट 2026 मध्ये करण्यात आलेल्या मूड ऑफ द नेशन सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वाधिक पसंतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरले आहेत. त्यांना 48.7 टक्के लोकांचा पाठिंबा मिळाला आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी 27.1 टक्के समर्थनासह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि टीव्हीकेचे संस्थापक सी. जोसेफ विजय 9.2 टक्के समर्थनासह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. विजय यांचे तिसऱ्या क्रमांकावर येणे विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. कारण त्यांनी 2024 मध्येच आपल्या तमिळगा वेत्री कळगम (TVK) या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. एवढ्या कमी कालावधीत पंतप्रधानपदासाठी देशातील पसंतीच्या नेत्यांच्या यादीत त्यांचे नाव येणे ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची बाब मानली जात आहे.
अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादव यांना मागे टाकले
भाजप विरोधी आघाडीचे नेतृत्व करण्यासंदर्भातील प्रश्नावरही विजय यांना चांगला पाठिंबा मिळाला आहे. या प्रश्नात राहुल गांधी 29 टक्के समर्थनासह पहिल्या क्रमांकावर, तर विजय 12.2 टक्के समर्थनासह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे, या मुद्द्यावर विजय यांनी ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादव यांसारख्या अनुभवी नेत्यांनाही मागे टाकले आहे. त्यामुळे कमी कालावधीतच विजय यांनी राष्ट्रीय राजकारणात आपली ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली असल्याचे दिसत आहे.
काँग्रेसची चिंता वाढणार?
मूड ऑफ द नेशन सर्व्हेचे निकाल समोर आल्यानंतर थुथुकुडीमध्ये टीव्हीकेच्या कार्यकर्त्यांनी विजय यांचा भावी पंतप्रधान असा उल्लेख करत पोस्टर्स लावले आहेत. तमिळगा वेत्री कळगमच्या नेत्यांनी विजय यांना 2029 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याची मागणी केली आहे. टीव्हीके नेत्यांनी दावा केली की, तमिळनाडू सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे मुख्यमंत्री विजय यांची लोकप्रियता उत्तर भारतीय राज्यांमध्येही वाढली आहे.
दुसरीकडे, काँग्रेससाठी टीव्हीके नेत्यांची ही मागणी चिंताजनक ठरू शकते. काँग्रेसने स्पष्ट केले आहे की 2029 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. तामिळनाडू काँग्रेसच्या नेत्यांनी टीव्हीकेवर टीका करताना हा पक्ष अद्यापही फॅन क्लबप्रमाणेच काम करत असल्याचे म्हटले आहे.
