पंतप्रधानपदाचा चेहरा ठरवा, इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची भूमिका; राऊतांनी सगळं सांगितलं!

इंडिया आघाडीतील बैठकीत एक आराखडा ठरला आहे. या बैठकीत ठरल्याप्रमाणे भारताच्या सरन्यायाधीशांना एक पत्र लिहिले जाणार आहे. त्यात एसआयआरचा विषय असेल. नीट पेपरफुटीचा विषय असेल, विषयी लिहिले जाणार आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली.

पंतप्रधानपदाचा चेहरा ठरवा, इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची भूमिका; राऊतांनी सगळं सांगितलं!
sanjay raut and indian alliance
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 08, 2026 | 6:01 PM

India Alliance Meeting : इंडिया आघाडीची राजधानी दिल्लीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस, ठाकरे यांची शिवसेना तसेच इतर महत्त्वाच्या पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीत एकूण पाच मुद्द्यांवर विरोधी पक्षांची सहमती झाल्याचे समोर आले आहे. तसेच आगामी ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा इंडिया आघाडीची बैठक पार पडेल, असेही सांगण्यात आले आहे. याच बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी पंतप्रधानपदाचा उमेदवारी निवडला पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. खासदार संजय राऊत यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली.

म्हणूनच आपण पंतप्रधानपदाचा चेहरा निवडला पाहिजे

संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी बोलताना, सत्ता आम्हाला हवी आहे, हे सांगितलं तर तुमचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण, असं लोक विचारतात. म्हणूनच आपण पंतप्रधानपदाचा चेहरा निवडला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांचे मत आहे. लोकांपुढे हा चेरहा येऊ दिला पाहिजे. देशाचं नेतृत्त्व करणारा हा आमचा चेहरा आहे, असे आपण लोकांना दाखवले पाहिजे, असेही मत ठाकरे यांनी मांडले. महागाई, घोटाळे, बेरोजगारी असेही काही मुद्दे आहेत. परंतु उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत एकूण तीन मुद्दे मांडले, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

इंडिया आघाडीची पुढची बैठक…

तसेच, इंडिया आघाडीतील बैठकीत एक आराखडा ठरला आहे. या बैठकीत ठरल्याप्रमाणे भारताच्या सरन्यायाधीशांना एक पत्र लिहिले जाणार आहे. त्यात एसआयआरचा विषय असेल. नीट पेपरफुटीचा विषय असेल, विषयी लिहिले जाणार आहे. इंडिया आघाडीची पुढची बैठक ऑगस्ट महिन्यात घेण्याचेही ठरले आहे. ती बैठक हैदराबाद येथे होईल. दीड महिन्यांत आम्ही वारंवार भेटत राहू, यावरही आमचे एकमत झाले आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर काय भूमिका?

कॉकरोच जनता पार्टीचे दिल्लीत आंदोलन झाले. याविषयी बैठकीत काही चर्चा झाली का? असेही संजय राऊत यांना विचारण्यात आले. या प्रश्नाचे उत्तर देताना, “अनेकांनी कॉकरोच जनता पार्टीविषयी आपली मतं मांडली. देशातील तरुणांत रोष आहे. हा रोष व्यक्त करण्यासाठी कॉकरोच जनता पार्टी हा मंच तरुणांना मिळत आहे. परंतु काँग्रेस पक्षाने यापेक्षाही अनेक मोठी आंदोलनं केली आहेत. अनेक राज्यांत हे आंदोलन सुरू आहे. नीटच्या प्रकरणात लाठीहल्ले झाले आहेत. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. तरीदेखील आपण रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू, असे सगळ्यांचे मत आहे,” अशी महत्त्वाची माहिती संजय राऊत यांनी दिली.

Follow Us