यंदा 70 टक्के दुष्काळ… मान्सून दगा देण्याची शक्यता, Skymet च्या नव्या अंदाजाने चिंता वाढली
Skymet Monsoon Forecast : स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदा सरासरीच्या केवळ 85 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यंदा दुष्काळ पडण्याची शक्यताही 70 टक्के आहे.

राज्यासह संपूर्ण देशाची चिंता वाढवणारी बातमी आहे. स्कायमेटने मान्सूनच्या अंदाजात सुधारणा करत तो सरासरीच्या (LPA) 85 टक्क्यांवर आणला आहे. याचाच अर्थ यंदा सरासरीच्या केवळ 85 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यंदा दुष्काळ पडण्याची शक्यता 70 टक्के असल्याचेही स्कायमेटने म्हटले आहे. एल निनोचा प्रभाव यासाठी कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
पावसाची शक्यता 85 टक्क्यांपर्यंत कमी
खासगी हवामान अंदाज संस्था स्कायमेटने एप्रिलमध्ये यंदाचा मान्सून सामान्यपेक्षा 6 टक्के कमी, म्हणजेच LPA च्या 94 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र आता त्यात आणखी कपात करण्यात आली असून तो आता 85 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. याबाबत माहिती देताना स्कायमेटने म्हटले की, ‘एल निनोची स्थिती अधिक मजबूत होत असून सकारात्मक IOD (Indian Ocean Dipole) बाबतची अनिश्चितता मान्सूनच्या उर्वरित कालावधीवर परिणाम करण्याची शक्यता आहे.
एल निनोची ताकद वाढणार
अहवालानुसार, देशभरात 1 जून ते 31 जुलैदरम्यान झालेला पाऊस सरासरीपेक्षा 13 टक्के कमी राहिला. आता ऑगस्टमध्ये LPA च्या 84 टक्के, तर सप्टेंबरमध्ये 80 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंह यांनी सांगितले की, ‘एल निनोची ताकद वाढत आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला एल निनोची स्थिती मजबूतवरून अत्यंत मजबूत श्रेणीत जाण्याची शक्यता आहे.’ याचा थेट परिणाम पावसावर होणार आहे.
शेती क्षेत्राला फटका बसणार
2023 मध्ये एल निनोच्या परिस्थितीमुळे मान्सून अनियमित राहिला होता. त्याचा परिणाम भारताच्या अन्नधान्य उत्पादनावर झाला आणि 2023-24 या पीक वर्षात (जुलै-जून) अन्नधान्य उत्पादनात 6.1 टक्क्यांची घट झाली होती. यापूर्वी भारतीय हवामान विभागाने (IMD) 2026 च्या नैऋत्य मान्सूनच्या हंगामी पावसाचा अंदाज सुधारून LPA च्या 90 टक्के केला होता. यापूर्वी IMD ने 92 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला होता.
अधिकृत हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत पाऊस LPA च्या 94 टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. भारताला चार महिन्यांच्या मान्सून हंगामात वर्षभरातील एकूण पावसाच्या 75 ते 80 टक्के पाऊस मिळतो. देशाच्या अन्नधान्य उत्पादनातील निम्म्याहून अधिक उत्पादन मान्सूनच्या पावसावर अवलंबून असते. भात, कापूस, कडधान्ये आणि तेलबिया यांसारख्या प्रमुख मान्सून किंवा खरीप पिकांसाठी पावसाचे प्रमाण, वितरण आणि वेळ अत्यंत महत्त्वाची असते. यात अनियमितता निर्माण झाल्यास शेती क्षेत्रावर याचा थेट परिणाम होतो.