प्रतिक्षा संपली, अखेर या मार्गावर कमाल करणार वंदेभारत एक्सप्रेस, काय केला बदल पाहा

वंदेभारत एक्सप्रेसची सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. आता कोचच्या बाहेरही मोटरमन आणि गार्ड तसेच प्लॅटफॉर्मच्या दिशेनेही डब्यांना कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे या ट्रेनच्या अवतीभवती सीसीटीव्हीचा पहारा असणार आहे.

प्रतिक्षा संपली, अखेर या मार्गावर कमाल करणार वंदेभारत एक्सप्रेस, काय केला बदल पाहा
vande bharat express
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jun 24, 2024 | 12:52 PM

देशातील पहिली सेमी हायस्पीड ट्रेन वंदेभारत एक्सप्रेस रेल्वे प्रवाशांना पसंद पडली आहे. या वंदेभारत एक्सप्रेसने प्रवाशांना आधुनिकतेबरोबरच वेगाने प्रवास घडविला जात असल्याने देशातील बहुतांशी मार्गावर या गाड्यांना मोठी मागणी आहे. वंदेभारतच्या आगमनानंतर या ट्रेनला दर ताशी 160 किमी वेगाने चालविण्यासाठी तयार केल्याचे सांगितले जात होते. परंतू सध्या भारतीय रुळांच्या स्थितीमुळे या ट्रेनला कमाल प्रति तास 130 किमी वेगानेच चालविले जात आहे. परंतू या मुंबई ते अहमदाबाद मार्गावर ही ट्रेन दर ताशी 160 किमी वेगाने चालविण्याची योजना आहे.

मुंबई ते अहमदाबाद मार्गावर वंदेभारत एक्सप्रेस ट्रेनचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर येत्या 15 ऑगस्टपासून वंदेभारताचा कमाल वेग दर ताशी 160 किमी इतका होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई आणि वडोदरा डिव्हीजनला रेल्वे बोर्डान 30 जूनपर्यंत या मार्गावरील रेल्वे रुळांच्या क्षमता वाढविण्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या मार्गावर कंफर्मेटरी ओसिलोग्राफ कार चालवून पाहणी करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने दिले आहेत. या योजनेमुळे वंदेभारत एक्सप्रेसला तिच्या कमाल वेगात चालविणे शक्य होणार आहे.

प्रवासात अर्ध्या तासांची बचत

मुंबई ते अहमदाबाद रेल्वेचे अंतर 491 किमी इतके आहे. सध्या या मार्गावर वंदेभारत एक्सप्रेसला 5 तास 15 मिनिटे लागतात. ट्रेनचा वेग वाढविल्यास या मार्गावर वंदेभारतने प्रवासाचा अर्ध्या तासांचा वेळ वाचणार आहे.

मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद मार्गावर सध्या दोन वंदेभारत एक्सप्रेस धावतात. एक ट्रेन रविवार वगळून दर दुसरी वंदेभारत बुधवार वगळता आठवड्याचे सर्व दिवस चालविण्यात येतात. मुंबई ते अहमदाबाद ट्रेन क्र. 22962 अहमदाबाद वरुन सकाळी 6.10 वाजता मुबईसाठी रवाना होते. ही ट्रेन सकाळी 11.35 वाजता मुंबई सेंट्रलला पोहचते. ही वंदेभारत मुंबई सेंट्रलला येण्यापूर्वी वडोदरा, सुरत, वापी आणि बोरीवली सारख्या काही स्थानकांवर थांबा घेते. तर परतीच्या प्रवासाची वंदेभारत दुपारी 3.55 वाजता मुंबई सेंट्रलहून रवाना होते आणि रात्री 9.25 वाजता अहमदाबादला पोहचते. परतीच्या प्रवासात ही ट्रेन दोन्ही दिशेला वडोदरा, सुरत, वापी आणि बोरीवली स्थानकांवर थांबा घेते.

या असतील सोयी सुविधा

वंदेभारत एक्सप्रेसच्या कोचच्या बाहेर रियर व्यू कॅमेऱ्यांसह चार प्लॅटफॉर्म साईड कॅमेरे बसविण्यात आले आहेत. चांगल्या प्रकारचे व्हेंटीलेशन, जीवाणूच्या मुक्ततेसाठी एअर कंडीशन्डच्या यंत्रणेत अल्ट्रा व्हॉयलेट उच्च क्षमतेचे कॉम्प्रेसर लावण्यात आले आहेत. आधुनिक कोच नियंत्रण व्यवस्थेमुळे कंट्रोल रुमशी नियंत्रण करण्यात आले असून सुरक्षा आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवली जात आहे.

Follow Us