देवेंद्र फडणवीस यांचा फॉर्म्युला तामिळनाडूतही, थलपती विजय यांचा खाते वाटपात मोठा निर्णय
थलपती विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर खाते वाटपात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच विजय यांनी गृह मंत्रालय स्वतःकडे ठेवले आहे. राजकारणाची जाण दाखवत त्यांनी कायदा सुव्यवस्था, पोलीस आणि नगर विकास यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून थलपती विजय यांनी 10 मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी विधानसभेत बहुमतही सिद्ध केलं. त्यामुळे थलपती विजय यांचं सरकार पाच वर्ष टिकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आत पाच दिवसानंतर थलपती विजय यांनी खाते वाटप केलं आहे. खाते वाटप करताना त्यांनी एखाद्या मुरलेल्या राजकारण्यासारखा निर्णय घेतलेला दिसतोय. खाते वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात जे केलं, तोच कित्ता थलपती विजय यांनी तामिळनाडूत गिरवला आहे. थलपती विजय यांनी गृह खातं स्वत:कडे ठेवलं आहे. विजय यांच्या या निर्णयाने राजकारणाची त्यांना किती जाण आहे हे अधोरेखित झालं आहे.
मुख्यमंत्री विजय यांनी स्वत:कडे गृह, पोलीस आणि नगर विकास खात्यासह अनेक महत्त्वाची खाती ठेवली आहे. लोकभवनातून या खाते वाटपाची यादी जाहीर झाली आहे. विजय यांच्याकडे सार्वजनिक, जनरल प्रशासन, भारतीय प्रशासनिक सेवा, भारतीय पुलीस सेवा, भारतीय वन सेवा, जिल्हा महसूल अधिकारी, पोलीस, गृह, विशेष कार्यक्रम क्रियान्वयन, महिला कल्याण, युवा कल्याण, बालक, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग कल्याण, नगर प्रशासन, शहरी आणि जल पुरवठा विभाग आहेत.
कुणाला काय?
तर एन आनंद यांना ग्रामीण विकास आणि जल संसाधन खातं देण्यात आलं आहे. आधव अर्जुना यांना लोक निर्माण आणि क्रीडा विकास विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. डॉ. के. जी. अरुणराज यांना आरोग्य, चिकित्सा शिक्षण आणि कुटुंब कल्याण मंत्रालय देण्यात आलं आहे. के. ए. सेंगोट्टैयन यांना अर्थ मंत्रालय देण्यात आलं आहे. आर. निर्मलकुमार यांना ऊर्जा संसाधन आणि विधी मंत्रालय देण्यात आलं आहे.
फडणवीस यांचं अनुकरण…
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या दोन्ही काळात गृह खातं स्वत:कडे ठेवलं होतं. कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राखण्यासाठी हे खातं महत्त्वाच्या व्यक्तीकडेच असणं आवश्यक असतं. त्यामुळेच फडणवीस यांनी दोन्ही मुख्यमंत्रीपदाच्या काळात आपल्याकडेच हे खातं ठेवलं होतं. एवढेच नव्हे तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना फडणवीस उपमुख्यमंत्री होते. तेव्हाही त्यांनी शिंदेंकडे गृह खातं न देता स्वत:कडे ठेवलं होतं. तर, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे खातं राष्ट्रवादीकडे होतं. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. हे विजय यांनाही माहीत आहे, त्यामुळे हे खातं त्यांनी आपल्याकडे ठेवलं आहे. शिवाय विरोधकांवर वचक ठेवणं हा त्यामागचा हेतू असल्याचंही सांगितलं जातं.