मोठी बातमी ! सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा तीन दिवस चालणार; शिंदे आणि ठाकरे यांना पुन्हा युक्तिवाद करावा लागणार?

राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व याचिका एकत्रित करून पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. हे प्रकरण सात न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे जावे अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती.

मोठी बातमी ! सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा तीन दिवस चालणार; शिंदे आणि ठाकरे यांना पुन्हा युक्तिवाद करावा लागणार?
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Feb 21, 2023 | 9:11 AM

संदीप राजगोळकर, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी ( Maharashtra News ) आजपासून पुन्हा सुरू होणार आहे. सलग तीन दिवस ही सुनावणी ( Supreme Court ) सुरू राहणार आहे. शिंदे आणि ठाकरे गटाच्या दोन्ही बाजूचे वकिल आजपासून तीन दिवस युक्तिवाद करणार आहेत. खरंतर यापूर्वीही मागील आठवड्यात सलग तीन दिवस युक्तिवाद झाला आहे. त्यामध्ये 16 आमदार अपात्रतेचा मुद्दा, विधानसभा अध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव, विधानसभा अध्यक्ष यांच्यावर अविश्वास ठराव की नोटिस यांसह उद्धव ठाकरे यांचा राजीनामा याविषयी युक्तिवाद पार पडलेला आहे.

राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व याचिका एकत्रित करून पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. हे प्रकरण सात न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे जावे अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती.

मात्र, हे संपूर्ण प्रकरण आता पाच न्यायमुर्तीच्या खंडपीठासमोरच होणार आहे. यामध्ये सर्वात कळीचा मुद्दा हा 16 आमदार अपात्र होणार आहेत का ? यासाठी नेमका काय युक्तिवाद पुन्हा केला जाईल याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून आहे.

दहाव्या सूचीनंतर विधानसभा अध्यक्ष यांचे अधिकार काय आहेत ? यावर कोर्टाचं काय म्हणणं असेल हा देखील महत्वाचा मुद्दा असणार आहे. त्यामुळे त्यावर दोन्ही बाजूने काय युक्तिवाद होतो हे पाहावं लागणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित 16 आमदार यांचा अपात्रतेच्या बाबतीच ठाकरे गटाकडून अधिक प्रभावीपणे युक्तिवाद केला गेला आहे. मात्र, त्याच वेळी शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्ष यांनी केलेली कारवाई नियमाला धरून नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला आहे.

याशिवाय उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य असल्याचा दावाही सुप्रीम कोर्टात करण्यात आला आहे. त्यावर देखील सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्याबाबतचे प्रकरण देखील ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं आहे. त्यावरून ठाकरे गटाने आक्षेप घेत थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यामध्ये ही सुनावणी देखील एकत्र घेतली जाईल का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता सलग तीन दिवस चालणार असल्याने त्यामध्ये आपली बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी दोन्ही गटाचे वकील हे विविध संदर्भ देत आहे. यामध्ये रेबिया, गोवा किहोटो केसचा देखील संदर्भ देण्यात आलेला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवसांत सुनावणी दरम्यान काय युक्तिवाद होतो याकडे लक्ष लागून आहे.

Follow Us