‘जास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही?’ उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचं आणखी एक वादग्रस्त विधान

| Updated on: Mar 22, 2021 | 1:09 AM

उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री आणि भाजप नेते तिरथ सिंह रावत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय.

जास्त धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही? उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचं आणखी एक वादग्रस्त विधान
Tirath Singh Rawat, Uttarakhand Chief Minister
Follow us on

देहरादून : उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री आणि भाजप नेते तिरथ सिंह रावत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. फाटक्या जिन्सवरुन केलेल्या विधानावर आधीच मोठ्या प्रमाणात टीका झालेली असताना आज (21 मार्च) रावत यांनी कोरोना काळात अधिक धान्य मिळवण्यासाठी तुम्ही अधिक मुलं जन्माला का घालत नाही? असा प्रश्न उपस्थितांना विचारलाय. विशेष म्हणजे त्यांनी नैनितालमधील सभेत भारतावर अमेरिकेने 200 वर्ष राज्यं केल्याचंही विधान केलं होतं. त्यानंतर त्यावरुन त्यांच्यावर जोरदार टीकाही होत होती. त्यातच त्यांच्या धान्यासाठी अधिक मुलं जन्माला घालण्याच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे (Tirath Singh Rawat controversial statement over more child birth for more ration).

‘ज्यांच्या घरात 20 सदस्य आहेत त्यांना एक क्विंटल धान्य मिळालं’

कोरोना काळात वाटप करण्यात आलेल्या धान्यवाटप कार्यक्रमाविषयी बोलताना तिरथ सिंह रावत म्हणाले, “कोरोना काळात प्रभावित झालेल्या प्रत्येक कुटुंबाला प्रती सदस्य 5 किलो धान्य मिळाले आहे. ज्यांच्या घरात 10 सदस्य आहेत त्यांना 50 किलो धान्य मिळालं. तसेच ज्यांच्या घरात 20 सदस्य आहेत त्यांना एक क्विंटल धान्य मिळालं. ज्या घरात 2 सदस्य आहेत त्यांना केवळ 10 किलो धान्य मिळाले. अनेक लोकांनी हे धान्य साठवलं आणि ते विकलं.”

‘वेळ असताना दोनच मुलांना जन्म दिल्याबद्दल तुम्हाला वाईट वाटेल’

“मी असा चांगला तांदुळ कधीही खालेला नाही. आता याचा दोष कुणाला द्यायचा? आपल्याकडे वेळ असताना आपण दोनच मुलांना जन्म दिल्याबद्दल आता तुम्हाला वाईट वाटेल. आपण 20 मुलांना जन्म का दिला नाही असंही तुम्हाला वाटत असेल,” असंही त्यांनी म्हटलं.

‘भारतावर अमेरिकेने 200 वर्षे राज्य केलं’, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडून अजब दावा

तिरथ सिंह रावत म्हणाले, “आपण अमेरिकेचे 200 वर्षे गुलाम होतो. संपूर्ण जगात अमेरिकेचं साम्राज्य होतं. त्यांच्या साम्राज्यावरी सूर्य कधीच मावळत नव्हता असंही सांगितलं जायचं. मात्र, कोरोना काळात त्यांची स्थिती वाईट झाली. पावणे तीन लाखांपर्यंत तेथील मृत्यूदर पोहचला. अगदी कमी लोकसंख्या असलेला आणि आरोग्यात क्रमांक एकवर असलेल्या देशाचा मृत्यूदर 50 लाखापेक्षा जास्त झाला. आजही येथील स्थिती बिकट आहे. हा देश पुन्हा लॉकडाऊनकडे प्रवास करत आहे.”

‘मोदींच्या जागेवर इतर कुणाचं नेतृत्व असतं तर भारताची कशी अवस्था झाली असती माहिती नाही’

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक आस जागवली. त्यांच्या जागेवर इतर कुणाचं नेतृत्व असतं तर भारताची कशी अवस्था झाली असती माहिती नाही. देशाची स्थिती वाईट झाली असती, पण मोदींनी आपल्याला मदत देण्याचं काम केलं. भारत 130-35 कोटी लोकसंख्येचा देश आहे. असं असलं तरी कोरोना काळात इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती दिलासादायक आहे,” असं मत रावत यांनी व्यक्त केलं.

“आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला वाचवण्याचं काम तर केलंच आहे, पण आपणही नियमांचं पालन केलं. जेव्हा मोदींनी म्हटलं की मास्क घाला, सॅनिटायझर वापरा, हात वारंवार धुवा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, तेव्हा लोकांनी हे सर्व केलं. त्यामुळेच आज भारताची स्थिती चांगली आहे,” असाही दावा तिरथ सिंह रावत यांनी केला.

हेही वाचा :

VIDEO: ‘भारतावर अमेरिकेने 200 वर्षे राज्य केलं’, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांकडून अजब दावा

जीन्सप्रकरण भोवले, अखेर मुख्यमंत्री रावत यांची माफी; म्हणाले…

मोदींचा हाफ चड्डीतला फोटो शेअर करत प्रियंका गांधींचे भाजप नेत्यांना चिमटे

व्हिडीओ पाहा :

Tirath Singh Rawat controversial statement over more child birth for more ration