BJP News : महत्वाच्या विधेयकांसाठी पाठिंब्याची गरज असताना ऐनवेळी तीन खासदार फिरले, भाजपला दिला जबर धक्का
BJP News : परिसीमन आणि अन्य महत्वाची विधेयकं मंजूर करुन घेण्यासाठी भाजपला जास्तीत जास्त खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. मागच्या काही दिवसांपासून भाजपकडून तशी रणनिती सुद्धा आखली जात आहे. पण आता मित्र पक्षातील तीन खासदारांनी भाजपला पाठिंबा द्यायला नकार दिलाय.

पश्चिम बंगालच्या राजकारणात विधानसभा निवडणूक निकालानंतर एक मोठी उलथा-पालथ पहायला मिळाली. ममता बॅनर्जी यांना लागोपाठ अनेक धक्के सहन करावे लागले. तृणमुल काँग्रेसच्या 28 खासदारांपैकी 20 खासदार फुटले. यातल्या तीन खासदारांनी मनापासून भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्वीकारलं नसल्याचं दिसत आहे. युसूफ पठाण, अबु ताहिर खान आणि खलिलुर रहमान हे तीन मुस्लिम खासदार सलग दुसऱ्यांदा NDA च्या बैठकीला गैरहजर राहिले. या तिन्ही खासदारांनी पश्चिम बंगालमधील भाजप सरकारविरोधात आवाज उठवला आहे. या तिन्ही मुस्लिम खासदारांनी गुरुवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली व पश्चिम बंगालमध्ये मशिदीवरुन जबरदस्ती लाऊड स्पीकर उतरवण्याच्या सुवेंदू सरकारच्या निर्णयाचा विरोध केला.
बहरामपूरचे खासदार युसूफ पठाण, मुर्शिदाबादचे खासदार अबु ताहिर खान आणि जांगीपूरचे खासदार खलिलुर रहमान यांनी गुरुवारी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. ‘मुस्लिम समुदायासोबत काही घडलं, तर खूप दु:ख होईल’ असं मुर्शिदाबादचे खासदार अबु ताहिर खान म्हणाले. “मशिदीत अजान होणार नाही, तर काय होणार?. या बाबतीत सुप्रीम कोर्टाने जे म्हटलय त्याला मान्यता दिली पाहिजे. पण मशिदीतून माइक उतरवणं चांगलं नाही” असं अबु ताहिर खान म्हणाले. आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. गृहमंत्र्यांनी आश्वस्त केल्याचं अबु ताहिर खान म्हणाले.
पत्रात या खासदारांनी काय म्हटलं?
खलीलुर रहमान, अबू ताहिर खान आणि माजी क्रिकेटपटू खासदार यूसुफ पठाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र दिलं. स्थानिक पोलीस प्रशासनाकडून मशिदीवरुन लाऊडस्पीकर आणि मायक्रोफोन हटवण्याचे निर्देश दिले जात आहेत. पत्रात हा सर्व उल्लेख आहे. देशातील कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाकडून ध्वनी प्रदूषण नियंत्रणासंदर्भात जे नियम आखून दिलेत त्याचा आम्ही सम्मान करतो असं या खासदारांनी स्पष्ट केलं.
हा मुस्लिम बहुल भाग
हे तिन्ही खासदार मुर्शिदाबाद जिल्ह्यातून येतात. हा मुस्लिम बहुल भाग आहे. हे तिन्ही खासदार NCPI पक्षाचा भाग आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर TMC च्या 20 खासदारांनी एक वेगळा गट बनवला. NCPI पक्षात त्यांनी प्रवेश केला. हा पक्ष आता भाजपप्रणीत एनडीएच्याजवळ आहे. एनडीए किंवा भाजपमध्ये आम्ही सहभागी होणार नाही असं या तिन्ही खासदारांचं स्पष्ट म्हणणं आहे. आम्हाला मतदारांना उत्तर द्यायचं आहे. आम्ही मुस्लिम विरोधी कुठल्याही निर्णयाचं समर्थन करणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.