हिंसक ट्रॅक्टर मार्चने शेतकरी आंदोलनाच्या अडचणीत वाढ, संसद घेराव रद्द होणार?

| Updated on: Jan 27, 2021 | 4:49 PM

हिंसक घटनांमुळे शेतकरी आंदोलनाच्या आगामी काळातील रणनीतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय

हिंसक ट्रॅक्टर मार्चने शेतकरी आंदोलनाच्या अडचणीत वाढ, संसद घेराव रद्द होणार?
Follow us on

नवी दिल्ली : मोदी सरकारने मंजूर केलेले नवे तीन कृषी कायदे तात्काळ रद्द करावेत या मागणीसाठी मागील 2 महिन्यांपासून शांततापूर्ण शेतकरी आंदोलन सुरु होतं. मात्र, प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) दिल्लीत काही ठिकाणी शेतकरी आंदोलकांनी आक्रमक रुप धारण केलं आणि हिंसाचार झाला. यामुळे शेतकरी आंदोलनाला मोठा धक्का बसलाय. शेतकरी आंदोलनातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनीही या हिंसक घटनांचा निषेध केलाय. तसेच या हिसेंमागे आंदोलनाबाहेरील काही समाजविघातक घटक असल्याचा आरोप केलाय. असं असलं तरी या हिंसक घटनांमुळे शेतकरी आंदोलनाच्या आगामी काळातील रणनीतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय (Tractor rally impact farmer protest march on 1 february on parliament whats next plan).

शेतकरी आंदोलनाच्यावतीने 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर होत असताना कृषी कायद्यांचा विरोध करत हे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी संसदेला घेराव घालण्यात येणार आहे. मात्र, प्रजासत्ताक दिनी झालेल्या घटनाक्रमाने हा नियोजित संसद घेराव होणार की नाही यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. शेतकरी आंदोलनातील समन्वय समितीने आगामी 2 दिवसात आंदोलनाची पुढील रुपरेषा जाहीर करणार असल्याचं म्हटलंय.

मागील 2 महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन अत्यंत शिस्तबद्धपणे सुरु होतं. त्यामुळेच केंद्र सरकारला शेतकऱ्यांसोबत तोडगा काढण्यासाठी अनेकदा चर्चा कराव्या लागल्या आहेत. सरकारकडून थेट आंदोलन दडपण्याचा प्रयत्नही झाला नाही. यामागे या शेतकरी आंदोलनाला देशभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळालाय. मात्र, हिंसक घटनांनी शेतकरी आंदोलनाच्या याच ताकदीला धक्का बसलाय. त्यामुळे आगामी काळात आंदोलक समन्वयकांकडून अशा घटना होणार नाहीत यासाठी कृती कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे.

हिंसक घटनांनंतर योगेंद्र यादव, राकेश टिकैत आणि इतर अनेक नेत्यांनी या घटनांचा निषेध केलाय. तसेच उपद्रव करणारे लोक आंदोलनाबाहेरील असल्याचं म्हटलं. असं असलं तरी केंद्र सरकारकडून अजूनही आंदोलनावर थेट टीका झालेली नाही. आंदोलनाला मिळणारा देशभरातील पाठिंबा पाहता केंद्राने सावध भूमिका घेतलीय. असं असलं तरी याआधी शेतकरी आंदोलनाच्या पाठिशी उभ्या असलेल्या विरोधी पक्षांनी मात्र हिंसक घटनानंतर सावध भूमिका घेण्यास सुरुवात केली. काँग्रेससह इतर पक्षांनी हिंसक घटनांचा निषेध करत आपल्याला आंदोलनापासून बाजूला केलंय.

आंदोलनाला जवळून पाहणाऱ्या जाणकारांनी मात्र या हिंसक घटनानंतर शेतकरी आंदोलन अधिक सावध होऊन पुढे येईल असं मत व्यक्त केलंय. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी झालेल्या हिंसक घटनांना सर्व शेतकरी आंदोलनाला जबाबदार धरणंही योग्य नसल्याचं मत व्यक्त केलंय. हिंसक घटनांमुळे शेतकरी नेते देखील व्यथित आहेत, मात्र ते आपल्या मागणीवर ठाम असून शेतकरी आंदोलन सुरुच राहिलं, असंही निरिक्षण नोंदवलं जातंय.

संबंधित बातम्या :

Farmers Tractor Rally : शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर फडकावलेला झेंडा नेमका कशाचा?

‘केंद्र सरकारनं नाटकबाजी थांबवावी’, राजू शेट्टींचा हल्लाबोल, छगन भूजबळही आक्रमक

Fact Check : दिल्लीतल्या ट्रॅक्टर रॅलीला भडकवण्याचा आरोप असलेल्या अभिनेता दिप सिद्धुचं भाजप कनेक्शन? वाचा सविस्तर

व्हिडीओ पाहा :

Tractor rally impact farmer protest march on 1 february on parliament whats next plan