देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन मुंबईवरुन? राजधानीचा 16 तासांचा प्रवास वंदे भारतमुळे 12 तासांवर

Vande Bharat Sleeper Train: ट्रेनच्या स्पीडसोबत सुरक्षा वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. या संपूर्ण मार्गावर भारतीय रेल्वेने 'कवच' तंत्रज्ञान सुरु केले आहे. यामुळे दोन ट्रेन समोरासमोर आल्यावर त्यांचा अपघात होणार नाही. भारतीय रेल्वेची सध्याची वेग मर्यादा 70 ते 80 किमी प्रतितास आहे.

देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन मुंबईवरुन? राजधानीचा 16 तासांचा प्रवास वंदे भारतमुळे 12 तासांवर
vande bharat sleeper
Jitendra Zavar | Updated on: Sep 09, 2024 | 10:59 AM

Vande Bharat Sleeper Train: देशात वंदे भारत सिटींग ट्रेननंतर आता स्लीपर ट्रेनचे आगमन होणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच या ट्रेनची पाहणी करत तिचे फोटोही शेअर केले. देशातील पहिली स्लीपर ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार आहे, त्याची उत्सुक्ता सर्वांना लागली आहे. ही ट्रेन मुंबईवरुन दिल्ली धावणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यासाठी लागणारी सर्व तांत्रिक तपासणी पूर्ण झाली आहे. मुंबई दिल्ली मार्गावरुन धावणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसला ही पर्यायी ट्रेन मिळणार आहे. यामुळे मुंबई ते दिल्ली 16 तासांचा प्रवास वंदे भारतमुळे 12 तासांवर येणार आहे.

मुंबई ते दिल्ली दरम्यान 160kmph वेग

देशातील पहिली स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन तयार झाली आहे. बंगळुरुमध्ये तिचे अनावरण करण्यात आले. या ट्रेनचे स्टेटिक ट्रायल सुरु झाले आहे. हे ट्रायल दहा दिवस सुरु राहणार आहे. यामध्ये ट्रेनच्या सॉफ्टवेअरचे सुद्धा ट्रायल होणार आहे. तसेच मुंबई ते दिल्ली दरम्यान 160kmph वेगाने धावणाऱ्या रेल्वेसाठी सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामुळे स्लीपर वंदे भारत मुंबई ते दिल्ली दरम्यान धावणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे. स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेससंदर्भात बोलताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजधानी ट्रेनला ही पर्याय असल्याचे म्हटले होते.

‘मिशन रफ्तार’ योजना राबवली

वंदे भारत स्लीपर दरम्यान अनावरण कार्यक्रमात ही ट्रेन 160kmph वेगाने धावू शकते, असे सांगण्यात आले होते. मुंबई ते दिल्ली दरम्यान 160 किमी वेगाने धावणाऱ्या ट्रेनसाठी ‘मिशन रफ्तार’ योजना सुरु करण्यात आली होती. 1,478 किमीमार्गावर त्यासाठी 8 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. तसेच मुंबई ते अहमदाबाद मार्गावर 130kmph वेगाची चाचणी यशस्वी झाली आहे.

भारतीय रेल्वेचे ‘कवच’ तंत्रज्ञान

ट्रेनच्या स्पीडसोबत सुरक्षा वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. या संपूर्ण मार्गावर भारतीय रेल्वेने ‘कवच’ तंत्रज्ञान सुरु केले आहे. यामुळे दोन ट्रेन समोरासमोर आल्यावर त्यांचा अपघात होणार नाही. भारतीय रेल्वेची सध्याची वेग मर्यादा 70 ते 80 किमी प्रतितास आहे. ती 160 किमी प्रतितास करण्यावर भर दिला जात आहे. ट्रेनची स्पीड वाढवण्यासाठी रेल्वे ट्रॅकच्या खाली असलेला बेस वाढवला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेड इन इंडिया प्रकल्पातंर्गत ही रेल्वे सुरु करण्याचे सांगितले होते. त्यानुसार, भारतातच ही तयार केली गेली आहे.

Follow Us