दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांचा जाहीर पाठिंबा, म्हणाले सरकारने संवाद साधावा!
ड. आंबेडकरांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भूमिकेवरही बोट ठेवले. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी सोनम यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी (एकता दर्शवण्यासाठी) येथे यायला हवे होते, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Sonam Wangchuk Delhi Protest : सध्या राजधानी दिल्लीमध्ये नीट परीक्षेत झालेल्या पेपर फुटीविरोधात मोठे आंदोलन सुरू आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सोमन वांगचुक तसेच इतर काही विद्यार्थी हे अन्नत्याग आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा वाढत आहे. कित्येक खासदार तसेच नेत्यांनी वांगचुक यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दिला. वांगचूक यांचा आज उपोषणाचा 19 वा दिवस आहे. यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकरांनी ट्विट द्वारे पोस्ट करत म्हटले की, भाजपने त्यांच्याशी तातडीने संवाद सुरू केला पाहिजे. संवाद साधण्याची सरकारची कोणतीही सदिच्छा दिसत नाही. सवादं साधणे ही एक घटनात्मक जबाबदारी आणि नैतिक कर्तव्य आहे.
लोकशाहीवर गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत
ॲड. आंबेडकर म्हणाले की, ज्या व्यक्तीला एक नाविन्यपूर्ण संशोधक (इन्व्हेंटर), शिक्षण सुधारक आणि हवामान कार्यकर्ता म्हणून केलेल्या कार्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत, अशा व्यक्तीचा आवाज ऐकण्यासही सरकार नकार देत आहे, असे आपण समजायचे का? जर अशा नागरिकाचे शब्द सत्तेत बसलेल्यांना गैरसोयीचे वाटत असतील, तर यामुळे आपल्या लोकशाहीवर गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.
राहुल गांधी यांच्या भूमिकेवर ठेवले बोट
ॲड. आंबेडकरांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भूमिकेवरही बोट ठेवले. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी सोनम यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी (एकता दर्शवण्यासाठी) येथे यायला हवे होते. मला माहीत आहे की काँग्रेस पक्ष नीट (NEET) पेपर लीक प्रकरणावरून सरकारकडून जाब विचारत आहे. मी स्वतः महाराष्ट्रात हीच लढाई लढत आहे. अशा वेळी, त्यांनी येथे येऊन सोनम यांना पाठिंबा द्यायला हवा होता. जसा मी दिला आहे आणि इतर अनेकांनी दिला आहे, असेही मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
ज्याप्रमाणे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून नीट (NEET) पेपर लीक घोटाळ्यासाठी जबाबदार धरले. राहुल गांधी यांचीही विरोधी पक्षनेते म्हणून, सत्तेत असलेल्यांविरुद्ध लढणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची जबाबदारी आहे, असेही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले.