ममता बॅनर्जींचा खेला करणारे ऋतब्रत बॅनर्जी आहेत तरी कोण? दोन पक्षांमधून झाली होती हकालपट्टी

Who is Ritabrata Banerjee : 58 आमदारांचा गट आता ममता बॅनर्जी यांच्यापासून वेगळा झाला आहे. ऋतब्रत बॅनर्जी हे या 58 आमदारांच्या गटाचे नेते आहेत. ऋतब्रत बॅनर्जी नेमके कोण आहेत ते जाणून घेऊयात.

ममता बॅनर्जींचा खेला करणारे ऋतब्रत बॅनर्जी आहेत तरी कोण? दोन पक्षांमधून झाली होती हकालपट्टी
who is ritabrata Banerjee tmc rebel leader
Image Credit source: Google
| Updated on: Jun 03, 2026 | 6:02 PM

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. टीएमसीमध्ये उभी फूट पडली आहे. 58 आमदारांचा गट आता ममता बॅनर्जी यांच्यापासून वेगळा झाला आहे. ऋतब्रत बॅनर्जी हे या 58 आमदारांच्या गटाचे नेते आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ बोस यांनी ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली आहे. ममता बॅनर्जी यांनी शोभनदेब चट्टोपाध्याय यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र त्यानंतर पक्षात बंडाळी उफाळून आली आहे. आता ऋतब्रत बॅनर्जी हे विरोधीपक्षनेते असणार आहेत.

ऋतब्रत बॅनर्जी नवे विरोधीपक्षनेते

समोर आलेल्या माहितीनुसार, 80 पैकी 60 आमदारांनी शोभनदेब चट्टोपाध्याय यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्य करण्यास नकार दिला होती. त्यानंतर ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली 58 आमदारांनी विधानसभा अध्यक्ष रवींद्रनाथ बोस यांची भेट घेतली. आम्हीच टीएमसीचा खरा गट आहोत आणि ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेतेपदाची मान्यता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. आमदारांच्या मागणीचा विचार करून विधानसभा अध्यक्षांनी ऋतब्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली आहे. हा बॅनर्जी यांना मोठा धक्का मानला जात आहे.

कोण आहेत ऋतब्रत बॅनर्जी?

ऋतब्रत बॅनर्जी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटना एसएफआयमधून केली होती. त्यानंतर 2020 मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ऋतब्रत बॅनर्जी हे उलुबेरिया पूरबा विधानसभा मतदारसंघातून टीएमसीच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार रुद्र प्रसाद बॅनर्जी यांचा 11,838 मतांनी पराभव केला होता.

दोन वेळा राज्यसभा खासदार

यापूर्वी ते दोन वेळा राज्यसभा सदस्य राहिले आहेत. सुरुवातीला ते सीपीआय (एम) पक्षाकडून 2017 मध्ये राज्यसभेवर गेले होते. मात्र नंतर त्यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला आणि 2024 मध्ये पक्षाकडून 15 महिन्यांसाठी राज्यसभा खासदार बनले होते. आता त्यांनी वेगळा गट स्थापन करत ममता बॅनर्जी यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कारण काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टीही केली होती.

दोन पक्षातून हकालपट्टी

ऋतब्रत बॅनर्जी यांना पक्षातून बाहेर काढण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून सीपीआय (एम)ने त्यांची हकालपट्टी केली होती. त्यानंतर त्यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला. आता टीएमसीनेही त्यांच्यावर अशाच प्रकारचे आरोप करत पक्षातून बाहेर काढले आहे. मात्र आता त्यांनी थेट ममता बॅनर्जी यांच्याविरोधात बंड पुकारले आहे.

Follow Us