नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपची सर्व मदार पाच गोष्टींवर अवलंबून आहे. मात्र, हे सर्व डावपेच लढवले तरी बंगालमध्ये भाजपला 100 पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत, असा पुनरुच्चार निवडणूक रणनीतीतज्ज्ञ प्रशांत किशोर (Prashant Kishore) यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये थेट लढत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रसचे कितीही नेते पक्ष सोडून गेले असले तरी त्याचा फटका ममता बॅनर्जींना बसणार नाही, असा दावाही प्रशांत किशोर यांनी केला. (Hindu voters in West Beganl don’t have that much affection about BJP)
‘द इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केले. यावेळी त्यांनी आपण भाजपला बंगालमध्ये 100 जागा जिंकण्यासाठीही संघर्ष करावा लागेल, या मतावर अजूनही ठाम असल्याचे सांगितले. मात्र, भाजपने पश्चिम बंगालची निवडणूक जिंकली तर देशात भाजपचा एकाधिकारशाही निर्माण होईल, असा इशारा प्रशांत किशोर यांनी दिला.
तसेच पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच एखाद्या प्रादेशिक पक्षाला राष्ट्रीय पक्षाकडून अशाप्रकारे आव्हान मिळाल्याची परिस्थिती उद्भवली आहे. यापूर्वी काँग्रेस पक्षही कधीच बंगालमधील डाव्या पक्षांसमोर असे आव्हान उभे करू शकला नव्हता, याकडेही प्रशांत किशोर यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपची मदार 5 गोष्टींवर असल्याचे प्रशांत किशोर यांनी सांगितले. यामध्ये धुव्रीकरण, ममता बॅनर्जी यांची प्रतिमा मलीन करणे आणि लोकांमध्ये त्यांच्याविषयी राग उत्पन्न करणे, तृणमूल काँग्रेस पक्षाला घरघर लागली आहे हे दाखवून देणे, दलित व्होटबँक खेचणे व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा जास्तीत जास्त फायदा मिळवणे, यांचा समावेश आहे.
गेल्यावर्षीपासून भाजपने पश्चिम बंगालमध्ये 200 जागा जिंकू, अशी जोरदार हवा निर्माण केली आहे. त्यासाठी अगदी जातीय मुद्द्यांवरही निवडणूक लढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, भाजपला 100 जागा जिंकण्यासाठीही झगडावे लागेल. भाजपने पश्चिम बंगालमध्ये 200 जागांवर विजय मिळवला तर मी माझा पेशा सोडून देईन, या विधानावर मी आजही ठाम असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले.
पश्चिम बंगालमध्ये भाजपला जिंकायचे असेल तर राज्यातील 60 टक्के हिंदू मतदारांना आपल्याकडे वळवावे लागेल. सध्याची परिस्थिती पाहता हिंदू मतदारांमध्ये भाजपविषयी तितकेसे ममत्त्व नाही.
ममता बॅनर्जी या 10 वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात अँटी-इन्कम्बन्सी निश्चित असेल. पण बंगालमधील जनता अजूनही ममता बॅनर्जी यांच्यावर प्रेम करते. त्यामुळे या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच बाजी मारेल, असे प्रशांत किशोर यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
VIDEO: ममता बॅनर्जींनी सांगितलं तरी प्रचार करणार नाही; तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँचा पारा चढला
(Hindu voters in West Beganl don’t have that much affection about BJP)