
इस्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, इस्रायलने इराणवर हल्ला केला आणि या युद्धाला सुरुवात झाली. अमेरिकेनं आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या असून, सैनिकांसह काही नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला असून, त्याची थेट मोठी झळ आता जगातील अनेक देशांना बसणार आहे. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. भारत इराणकडून कच्च्या तेलाची खरेदी करतो, दरम्यान जर या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळा आला तर भारतामध्ये पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढू शकतात, जाणून घेऊयात भारत इराणकडून कोणत्या गोष्टींची खरेदी करतो आणि त्याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो?
कच्चं तेल
एकेकाळी इराण हा भारताचा प्रमुख तेल पुरवठादार देश होता. परंतु अमेरिकेनं घातलेल्या निर्बधांमुळे भारताने इराणकडून कच्च्या तेलाची खरेदी कमी केली. मात्र इराणकडून होणारा तेल पुरवठा या युद्धामुळे बंद झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होऊ शकते, ज्याचा थेट मोठा फटका हा भारताला बसण्याची शक्यता आहे.
पेट्रोकेमिकल आणि केमिकल उत्पादने
भारत इराणकडून काही खास पेट्रोकेमिकल्स आणि औद्योक क्षेत्रासाठी लागणारे केमिकल्स आयात करतो. या केमिकल्सचा वापर प्लास्टिक, खते, औषधी या सारख्या उत्पादनात होतो, दरम्यान या युद्धामुळे या केमिकल्सचा पुरवठा बाधित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या वस्तू भारतात महाग होऊ शकतात.
सुकामेवा आणि फळं
भारत इराणकडून पिस्ता, खजूर, केसर, आणि इतर काही सुकामेवा आयात करतो. या सोबतच सफरचंद आणि किवी सारखे फळं देखील भारत इराणकडून आयात करतो, मात्र युद्धामुळे आता सप्लाय चेन बाधित होण्याची शक्यता आहे. सप्लाय चेन बाधित झाल्यास सुकामेवा आणि फळाचे दर भारतामध्ये वाढण्याची शक्यता आहे.
काच आणि औद्योगिक उपकरणं
भारत इराणकडून काच आणि इतर काही औद्योगिक उपकरणं देखील खरेदी करतो. युद्धामुळे आयात ठप्प झाल्यास काचेचं सामान भारतामध्ये महागण्याची शक्यता आहे.