भारताविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर करणार का? पाकिस्तानचं एक पाऊल मागं, पाकच्या संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य

पाकिस्तानकडून वारंवार भारताला अण्वस्त्र हल्ल्याच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत, याबाबत आता पाकच्या संरक्षण मंत्र्यांनी मोठा खुलासा केला आहे.

भारताविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर करणार का? पाकिस्तानचं एक पाऊल मागं, पाकच्या संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 10, 2025 | 4:08 PM

पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला, या हल्ल्याचा बदला भारतानं घेतला आहे. भारतानं मिशन सिंदूर राबवलं, पीओके आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यात आला, या एअर स्ट्राईकमध्ये पीओकेमधील पाच तर पाकिस्तानमधील चार दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली, मात्र त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे, पाकिस्तानकडून भारतावर अनेकदा हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र भारताच्या डिफेंस सिस्टिमनं हे हल्ले परतून लावले, भारताकडून पाकिस्तानची रडार सिस्टिम पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली आहे.

दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अणू बॉम्ब संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. ते जियो न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बोलत होते, यावेळी त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही भारताविरोधात अण्वस्त्र हल्ला करण्याचा विचार करत आहात का? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, असा कोणताही पर्याय आमच्यासमोर नाहीये. आम्ही अशा कोणत्याही पर्याचा विचार करत नाही आहोत.

मात्र हे सर्व जर इथेच थांबलं नाही तर याचे परिणाम खूप गंभीर होऊ शकतात, मोठा विनाश होऊ शकतो. भारतानं निर्माण केलेली सध्याची परिस्थिती पाहाता आता आमचे पर्यात कमी होत चाललेले आहेत. नॅशनल कमांड अथॉरिटी (एनसीए) ची आम्ही कोणतीही बैठक बोलावलेली नाहीये,पाकिस्तानच्या अण्वस्त्रांबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी एनसीएची असल्याचं पाकच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे अशी देखील माहिती समोर येत आहे की, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत चालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी चर्चा केली, त्यांनी रुबियो यांना असं सांगितलं की, आता चेंडू भारताच्या कोर्टात आहे. युद्ध ही आमची प्राथमिकता नाही, आम्हाला शांतता हवी आहे, भारताने कारवाई थांबवली तर आम्ही शांततेचा विचार करू, मात्र दुसरीकडे पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असल्याचं दिसून येत आहे.