Premanand Maharaj : मुस्लिम तरुणाची किडनी घेणार? प्रेमानंद महाराजांकडून मोठा खुलासा, आरिफचे का मानले आभार

Premanand Maharaj : प्रेमानंद महाराज अनेक वर्षांपासून किडनीच्या आजारामुळे त्रस्त आहे. मूत्रपिंडाच्या आजारामुळे त्यांना नियमितपणे डायलिसिस करावे लागते. त्यांच्यासाठी आरिफ या मुस्लिम तरुणाने किडनी दान करण्याचा निर्णय जाहीर केला.

Premanand Maharaj : मुस्लिम तरुणाची किडनी घेणार? प्रेमानंद महाराजांकडून मोठा खुलासा, आरिफचे का मानले आभार
प्रेमानंद महाराज
| Updated on: Aug 27, 2025 | 2:07 PM

प्रेमानंद महाराज यांचा मोठा चाहता वर्ग आहे. इंटरनेटवर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या कित्येक पट आहे. त्यात सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांपर्यंत अनेकांचा सहभाग आहे. वृदांवनचे संत प्रेमानंद महाराज हे गेल्या कित्येक वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. मूत्रपिंडाच्या आजारामुळे त्यांना नियमितपणे डायलिसिस करावे लागते. त्यांच्यासाठी मध्यप्रदेशातील इटारसी येथील एक मुस्लिम तरुण आरिफ याने किडनी दान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने यासंबंधीचे पत्रही महाराजांना लिहिले. त्यामुळे देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

महाराजांच्या प्रवचनांनी आरिफ प्रभावित

इटारसी येथील आरिफ चिश्ती हा महाराजांचे प्रवचन आणि सत्संग रोज ऐकतो. त्यांच्या विचारांचा मोठा प्रभाव त्याच्या आयुष्यावर झाला. त्याच्या मनातील नकारात्मक विचार दूर झाले. महाराजांच्या समाज कार्याने आणि सडेतोड उत्तराने तो प्रभावित झाला. महाराजांना किडनीचा आजार असल्याचे त्याला समजले. मग या संतासाठी एक किडनी दान करण्याची त्याने तयारी केली. त्याने स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहित ही इच्छा बोलून दाखवली.

महाराजांनी विनम्रतेने दिला नकार

आरिफ चिश्तीची किडनी दान करण्याची बातमी महाराजांच्या कानावर आली. त्यांनी आरिफच्या भावनेचा आदर केला. त्याला धन्यवाद दिले. त्यांनी सांगितले की याची काही आवश्यकता नाही. संताकडून आरिफपर्यंत हा संदेश पाठवण्यात आला. आरिफच्या या भूमिकेचे महाराजांनी कौतुक केले. देशात सांप्रदायिक एकता, बंधुतेचा आरिफने मोठा संदेश दिल्याचे महाराज म्हणाले. विशेष म्हणजे आरिफला त्यांनी वृंदावनला येण्याचे आमंत्रण धाडले.

महाराज हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक

आरिफ चिश्ती महाराजांमुळे प्रभावित झाला आहे. महाराज हे कोणताही चमत्कार सांगत नाहीत. नाम जपाचे महत्त्व सांगतात. ते कोणत्याही धर्मावर टीका करत नाहीत. ते साध्या सोप्या भाषेत भक्तीचे महत्त्व सांगतात. ते हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिनिधी असल्याचे आरिफ म्हणतो. त्यामुळे अशा संताची भारताला आज गरज आहे. मी माझी किडनी त्यांना डोनेट करू इच्छितो. मी राहू अथवा न राहू. पण सध्याच्या द्वेषपूर्ण वातावरणात अशा संताची देशाला मोठी गरज असल्याचे आरिफला वाटते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us