मासिक पाळीच्या धोरणात व्यापक सुधारणा हव्या, News9 च्या कार्यक्रमात महिलांनी व्यक्त केली गरज!

माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या सुनीता सिंग चोकेन यांनीदेखील खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले. जेव्हा मी एव्हरेस्ट सर करत होते तेव्हा मला मासिक पाळी आली. त्या काळात मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, असे त्यांनी सांगितले.

मासिक पाळीच्या धोरणात व्यापक सुधारणा हव्या, News9 च्या कार्यक्रमात महिलांनी व्यक्त केली गरज!
NEWS9 SHECONOMY
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 28, 2026 | 8:06 PM

The SHEconomy Agenda, Period Power : आज म्हणजेच 28 मे रोजी जगभरात मेन्सट्रल हायजीन डे साजरा केला गेला. या दिवसाचे औचित्य साधून जगभरात महिलांना येणारी मासिक पाळी, मासिक पाळीबाबत असलेले गैरसमज, मासिक पाळीच्या काळात महिलांचे आरोग्य याविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. याच दिवसाचे औचित्य सादून News9 ने The SHEconomy Agenda, Period Power नावाचे चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्राच्या माध्यमातून महिलांच्या मासिक पाळीविषयी जनजागृती तसेच कामाच्या ठिकाणी महिलांना मासिक पाळीदरम्यान येणाऱ्या अडचणी यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या दिग्गज आणि प्रतिष्ठित महिलांनी सहभाग नोंदवत महिलांच्या मासिक पाळीविषयी खुलेपणाने आपले मत मांडले.

आपल्या येथे कामाची संस्कृती ही पुरुषप्रधान आहे

सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशनच्या प्रोग्राम अँड अॅडव्होकसी विभागाच्या राष्ट्रीय संचालक नीरजा भटनागर यांनी आपले मत मांडले. आपल्या येथे कामाची संस्कृती ही पुरुषप्रधान आहे. त्यामुळे लिंगाधारित भेदभाव न करता सर्वसमावेशक कामाची पद्धत असायला हवी. महिलांच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी मासिक पाळीदरम्यान रजेच्या धोरणावर गांभीर्याने विचार करायला हवे, असे नीरजा भटनागर म्हणाल्या. तसेच सगळीकडे स्वच्छ आणि सहज उपलब्ध होणारे टॉयलेट ही पहिली गरज आहे. कामाच्या ठिकाणी ज्या पद्धतीने अन्य रजा असतात, तशीच रजा मासिक पाळीदरम्यान असायला हवी, असे मत सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील गीता लुथरा यांनी व्यक्त केले.

मासिक पाळीत रजा हवी

मॅक्स हेल्थकेअरच्या आयव्हीएफ विभागाच्या प्रमुख, डॉ. सुरवीन घुमन सिंधू यांनी मासिक पाळीविषयी असलेल्या गैरसमजांवर भाष्य केले. जोपर्यंत मासिक पाळीत रजा यासारख्या धोरणांची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत मासिक पाळीविषयी लोक उघडपणे बोलणार नाहीत. मासिक पाळी हा आयुष्यातील एक नैसर्गिक भाग आहे. कोणताही पूर्वग्रह न ठेवता यावर मुद्द्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे डॉ. सुरवीन सिंधू म्हणाल्या.

महिलाविषयक धोरणांची अमंलबजावणी प्रभाविपणे होणे गरजेचे

नीती आयोगाच्या माजी संचालक उर्वशी प्रसाद यांनीदेखील न्यूज9 च्या कार्यक्रमात भाग घेतला. अशी अनेक धोरणं आहेत, ज्यांची अंमलबजावणी होत नाही. महिलांना सुविधा दिल्या तर त्या या सुविधांचा गैरवापर करतील, अशाच दृष्टीकोनातून आजही पाहिले जाते. त्यामुळे आपल्याला महिलाविषयक धोरणांची अमंलबजावणी प्रभाविपणे होण्यासाठी या पूर्वग्रहाला बदलणे गरजेचे आहे, असे मत उर्वशी प्रसाद यांनी व्यक्त केले. द ह्युमन कॅपिटल कंपनीच्या सल्लागार डॉ. किरणप्रीत कौर यांनीदेखील मासिक पाळी, आरोग्य आणि त्यासंबंधीच्या प्रश्नांविषय जनजागृती करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.

एव्हरेस्ट सर करताना मासिक पाळी आली

माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या सुनीता सिंग चोकेन यांनीदेखील खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले. जेव्हा मी एव्हरेस्ट सर करत होते तेव्हा मला मासिक पाळी आली. त्या काळात मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ऑक्सिजनची कमतरता असताना तसेच शारीरिक आव्हानपेलून मी एव्हरेस्टचे शिखर गाठण्याचा प्रयत्न केला, अशी आठवण त्यांनी सांगितली. तसेच महिलांना मासिक पाळीदरम्यान पुरेसा पाठिंबा मिळत नसला तरीही त्या आज चांगली कामगिरी करताना दिसतात, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Follow Us