बच्चन ! तळ पाहिलेला माणूस

| Updated on: Dec 04, 2021 | 3:50 PM

आता बच्चननं रिटायर व्हायला व्हावं, त्या रेसमधून बाहेर पडायला पाहिजे. बच्चन त्याच्याशी कधीच सहमत होणार नाही. केबीसीचा एक हजारावा एपिसोड आहे. त्याच्या एपिसोडमध्ये तो म्हणतो, अभी तो खेल शुरु हुआ है. आणि तोच तर बच्चन आहे.

बच्चन ! तळ पाहिलेला माणूस
Amitabh Bachchan
Follow us on

मला बच्चन हा माणूस अफलातून वाटतो. एखाद्या इंडस्ट्रीवर एवढं निर्विवाद यश मिळवत रहाणं हे हार्डवर्कशिवाय शक्य नाही. बरं नुसतं गाढव काम कुठे कामाला येत नसतं. लकही सोबत असायला हवी. बच्चनला ती लाभली यात शंका नाही. चढ उतार असणारच. पाण्यात पोहोयचं म्हटलं तर कधी तरी तळ पहावाच लागतो. बच्चनसाठी तो कदाचित नव्वदीचा काळ असावा. केबीसीला 21 वर्षे पूर्ण झाली, त्यावेळेस बच्चन म्हणाले, फिल्ममध्ये काम मिळत नव्हतं म्हणून टीव्हीकडे वळलो. एवढ्या मोठ्या सुपरस्टारलाही कुणी काम देत नव्हतं हे केवढं मोठं भयाण वास्तव बच्चननी सांगितलं.

बच्चनच्या पराभवाच्या, अस्ताच्या गोष्टी त्यावेळेस रोज पेपरात छापून यायच्या. आम्ही त्यावेळेस नुकतेच कॉलेजात ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडलेली पोरं. पेपर उघडला की एक तरी बातमी बच्चनच्या फ्लॉप गेलेल्या एबीसीएलबद्दल असायची. त्यातले काही प्रसंग आता केबीसीचा एक हजारा एपिसोड पहाताना आठवले. हे कुणी सांगितलं की, वाचलं आता आठवत नाही. त्याची सत्यताही खरं तर माहित नाही. पण हे प्रसंग चर्चेतले आहेत. मराठीचा स्वत:ला सुपरस्टार म्हणणाऱ्या एका अभिनेत्यानं बच्चनच्या एबीसीएलमध्ये गुंतवणूक केली होती. पण बच्चनची ती कंपनी फेल गेली. त्याचा भाऊ त्याला जबाबदार असल्याची जोरदार चर्चाही झाली. खरं तर ह्या एका कंपनीमुळे बच्चनचं दिवाळं निघालं म्हणतात. त्या सुपरस्टार मराठी अभिनेत्यानं बच्चनकडे तगादा लावला पैशासाठी. ह्याच कलाकाराची पत्नीही इंडस्ट्रीत मोठी अभिनेत्री, तिनंच उलट नवऱ्याला सांगितलं, अरे तो बच्चन आहे, वाईट दिवस आहेत त्याच्यावर, मिळतील पैसे एवढा नको मागे लागू. पैशाच्या व्यवहाराचं काय झालं माहित नाही. पण नंतर मराठी सुपरस्टारच्या एका मोठ्या कार्यक्रमाला बच्चनच प्रमुख पाहुणे म्हणून हवे होते. पण त्याच्याकडे जाणार कोण? बच्चन यांना सुपरस्टारच्या पत्नीनं त्या वाईट दिवसात कसा संयम दाखवला याची कल्पना होती. त्यामुळे सुपरस्टार पत्नीनं शब्द टाकला आणि बच्चन तिच्या शब्दावर सोहळ्यासाठी हजर झाले. पडत्या काळात साथ देणाऱ्यांना विसरत नाही बच्चन.

तरण आदर्शनं एक मुलाखात घेतलेली आहे बच्चनची, त्यात तो म्हणतो, माझ्या कंपनीवर त्यावेळेस शंभर एक कोटीचं कर्ज होतं. त्याकाळात रोज घरी कुणी ना कुणी देणेदार येऊन शिव्या घालून जायचा. पण पर्याय नव्हता. नंतर काळ बदलला. मी पै ना पै चुकती केली. म्हणजे मी स्वत: देणेदाराच्या घरी जाऊन पैसे दिले. जर आमच्या सेटवर एखाद्यानं लाकूड जरी कापलं असेल तरी त्याचे पैसे घरी जाऊन चुकते झाले.

दुसरा एक प्रसंग त्याच्या वाईट दिवसातलाच

बच्चनकडे काही परदेशी पाहुणे येणार होते. पण त्याच्याकडे एकही गाडी राहिलेली नव्हती. मोठी अडचण होती. शेवटी बच्चन यश चोप्रांकडे गेला आणि त्यानं पाहुणे असेपर्यंत एक दोन कार्स घरापुढे उभे करण्याची विनंती केली. यश चोप्रानं अर्थातच योग्य ते केलंच. एवढच नाही तर ज्या काळात कुणीच काम देत नव्हतं, त्या काळात तो यश चोप्राकडे गेला आणि काम द्या म्हणाला. त्यानंतर यश चोप्रानं त्याला समोर ठेवून सिनेमा बनवला. तो होता शाहरुखसोबतचा मोहब्बते. 21 वर्षापुर्वीच आलेला. बच्चनचीच आणखी एक मुलाखत आहे यु ट्यूबवर अलिकडेच घेतलेली. त्यात तो म्हणतो, यशजींनी वाईट दिवसात साथ दिली. त्यामुळे त्यांच्याकडून कुठलीही विनंती आली तर मी डोळे झाकून हो बोलतो. त्या काळात त्यांनी मदत केली नसती तर आज मी तुमच्यासमोर नसतो.

बच्चन रोज ब्लॉग लिहितो. न चुकता. भलेही तो दोन ओळीचा असेल, एखादा फोटो असेल पण तो टाकतोच. कधी कधी वाटतं एवढं सगळं मिळवलेल्या माणसाला अजून कशाची भूक असेल? पण ज्यांच्या रोज लिहिण्याच्या नोकऱ्या आहेत ते कंटाळा करतात पण हा सुपरस्टार न चुकता ते करतो. त्याचं कारण कदाचित कन्सिस्टन्सी असेल. जगात हुशारांची कमी नाही पण कन्सिस्टन्सी त्या सगळ्यावर उजवा दागिना आहे. एखाद्याची हुशारी कमी असू शकते पण त्याच्याकडे सातत्य असेल कामात तर त्याच्या परिश्रमाचं सोनं होत रहातं दिवसेंदिवस. सातत्य राखणाऱ्यापुढं अफलातून हुशार माणसही मागे पडतात. बच्चनच्या ब्लॉगचा आजचा 5 हजार 36 दिवस आहे. एका वर्षात 365 दिवस असतात. वर्ष मोज किती वर्षांपासून तो सातत्यानं न विसरता ब्लॉग लिहितोय. हे सातत्य येतं कुठून?

एवढी दिवसरात्र मेहनत करण्याची प्रेरणा मिळते कुठून? बच्चनलाच हा प्रश्न एकदा विचारला गेला होता. तो म्हणाला, मला भीती वाटते काम न मिळण्याची. म्हणजे दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठेन त्यावेळेस माझ्याकडे काम नसेल तर मी काय करेन? खरंय, काम न मिळण्याची वेदना त्याच्यापेक्षा जास्त कुणाला जाणवू शकते? अलीकडेच सलीम खान म्हणाले, आता बच्चननं रिटायर व्हायला व्हावं, त्या रेसमधून बाहेर पडायला पाहिजे. बच्चन त्याच्याशी कधीच सहमत होणार नाही. केबीसीचा एक हजारावा एपिसोड आहे. त्याच्या एपिसोडमध्ये तो म्हणतो, अभी तो खेल शुरु हुआ है. आणि तोच तर बच्चन आहे.

हे सुद्धा वाचा:

Video: काम न मिळण्याची वेदना ते, खेल अभी खत्म नही हुआ है, बिग बींच्या केबीसीचा हजारावा एपिसोड, तुमच्याही डोळ्यात अश्रू आणेल
Omicron Breaking | कर्नाटकपाठोपाठ गुजरातमध्येही ओमिक्रॉनचा रुग्ण