Nanar Refinery Project: बारसूलाच रिफायनरी प्रकल्प उभारण्याची मागणी का?; वाचा सविस्तर

| Updated on: Mar 30, 2022 | 6:37 PM

नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प करण्यास स्थानिकांनी विरोध केल्यानंतर आता या प्रकल्पासाठी पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहेत. विदर्भात हा प्रकल्प आणण्याची मागणी भाजप आणि काँग्रेसकडून होत असली तरी आघाडीचे नेते मात्र हा प्रकल्प कोकणातच करण्यास इच्छुक आहेत.

Nanar Refinery Project: बारसूलाच रिफायनरी प्रकल्प उभारण्याची मागणी का?; वाचा सविस्तर
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: नाणारमध्ये रिफायनरी (Nanar Refinery Project) प्रकल्प करण्यास स्थानिकांनी विरोध केल्यानंतर आता या प्रकल्पासाठी पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहेत. विदर्भात हा प्रकल्प आणण्याची मागणी भाजप आणि काँग्रेसकडून होत असली तरी आघाडीचे नेते मात्र हा प्रकल्प कोकणातच करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांना पत्र लिहून राजापूरच्या बारसू येथे हा प्रकल्प उभारण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कोकणात रिफायनरीचा मुद्दा पुन्हा तापलाय. बारसू सोलगाव धोपेश्वर रिफायनरीसाठी 13 हजार एकर जागा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली आहे. तसेच बारसूमध्येच हा प्रकल्प का झाला पाहिजे याची कारणेही या पत्रातून देण्यात आली आहेत. मात्र, आता राजापूरकरांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे. बारसूमध्ये हा प्रकल्प होऊ नये म्हणून जोरदार निदर्शने सुरू आहेत. बारसूमध्येच हा प्रकल्प का केला जात आहे? याचा घेतलेला हा आढावा.

मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्रं

नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प करण्यास नाणारवासियांनी विरोध केला होता. प्रकल्पाच्या विरोधात नाणारवासियांनी मोठं आंदोलन उभारलं होतं. त्यानंतर हा प्रकल्प कोकणातच इतर ठिकाणी करण्यासाठी जागेची शोधाशोध सुरू झाली होती. त्यानुसार बारसू आणि सोलगाव या दोन गावातील जागांचा पर्याय सांगण्यात आला. त्यापैकी बारसूच्या जागेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना 12 जानेवारी रोजी पत्रं लिहून या गावात प्रकल्प करता येणार असल्याचं सांगितलं आहे.

बारसूतच प्रकल्प का?

बारसूत प्रकल्प का केला जावा याबाबतची माहिती या पत्रात देण्यात आली आहे. त्यासाठीची कारणंही दिली आहेत.

>> बारसूतील 13 हजार एकर जागा प्रकल्पाला दिली जाऊ शकते.
>> क्रूड ऑईल टर्मिनलसाठी नाटे गावात 2 हजार 144 एकर जागा देणार
>> रिफायनरीला दिली जाणारी बारसूतील 90 टक्के जागा पडीक
>> पडीक जागा असल्याने वाड्या वस्त्यांच्या स्थलांतराचा प्रश्नच नाही
>> आरआरपीसीएल टीमचाही प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद आहे
>> उद्योग मंत्र्यांसह सरकारच्या प्रतिनिधींचा बारसूतील स्थानिकांशी संवाद झाला आहे

नितेश राणेंचा विरोध

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे या प्रकल्पासाठी बारसू गावाचा पर्याय दिला आहे. मात्र त्याला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विरोध केला आहे. ग्रीन रिफायनरी केंद्राची आहे. ती जिथे ठरली आहे तिथेच होईल. बारसूची चर्चा केवळ शिवसेना आणि राज्यातील मंत्र्यांनी सुरू केली असून ही चर्चा त्यापुरतीच आहे. नाणारमध्ये ज्या गावांचा विरोध होता त्या गावांना वगळून प्रकल्प होणार आहे. प्रमोद जठार यांच्या नेतृत्वात दिल्लीत जाऊन नाणार प्रकल्पाबाबत संबंधित मंत्र्यांशी चर्चा करू, असं नितेश राणे यांनी सांगितलं.

स्थानिकांचा विरोध आणि निदर्शने

बारसूत रिफायनरी प्रकल्प होत असल्याने त्याला स्थानिकांनी विरोध केला आहे. आज स्थानिक नागरिकांनी जोरदार निदर्शने करत बारसूत होणाऱ्या प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. मुख्यमंत्र्यांनी बारसूत प्रकल्प व्हावा म्हणून पंतप्रधानांना 12 जानेवारीला पत्रं दिलं आहे. बारसू ही नाणारच्या बाजूला असलेली जमीन आहे. प्रकल्पासाठी बारसूचं नाव सूचवून शिवसेनेने कोकणातील जनतेची फसवणूक केली आहे. स्थानिक भूमिपुत्रांच्या मुळावर आला तर आम्ही शिवसेनेच्या मुळावर उठून बसू. या निर्णयाचे महापालिका निवडणुकीतही परिणाम भोगावे लागेल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. तसेच आजपासून आमचं आंदोलन सुरू झालं आहे. कामधंदा सोडून आम्ही आंदोलन सुरू केलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

काय आहे वाद?

बारसू आणि सोलगांव या दोन गावांपैकी सोलगाव या ग्रामपंचायतीनं एमआयडीसी आणि रिफायनरीला विरोध असल्याचा ठराव केला आहे. 28 जून 2021 रोजी याबाबतचा ठराव करण्यात आला आहे. तर, शिवणे खुर्द या गावानं देखील रिफायनरी आणि एमआयडीसी प्रकल्पाला विरोध दर्शवणारा ठराव केला आहे. गेल्यावर्षी 16 एप्रिल 2021 रोजी झालेल्या मासिक सभेत झालेला ठराव झाला आहे. 6 जून 2021ची तारीख त्यावर टाकत त्याची नकल केली गेली आहे. त्यामुळे आता नव्या जागेबाबत देखील सध्या विरोध दिसून येत आहे.

या गावांची जमीन जाणार

या नव्या जागेमध्ये राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे, गोवळ, शिवणे खुर्द आणि धाऊलवल्ली या गावांमधील सडा अर्थात जमीन जाणार आहे. त्यामुळे सध्या आता याबाबत देखील विरोध होत असल्याचं दिसून येत आहे. याविरोधात 30 जून 2021 रोजी बारसु – सोलगांव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेची देखील स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान, या साऱ्या घडामोडी घडत असल्या तरी रिफायनरी समर्थकांकडे किंवा त्यांच्या हालचाली आणि भू्मिकांकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाही.

संबंधित बातम्या:

Nanar Refinery Project : विदर्भात नाणार प्रकल्प नेण्यासाठी काँग्रेस नेता मला भेटला: संजय राऊत

Maharashtra News Live Update : स्टॅम्प ड्युटी वाढणार, घर, फ्लॅट, प्लॅाट नोंदणीसाठी लोकांची गर्दी

VIDEO: सदिच्छा भेट होती, पण राजकीय चर्चा झाली, Varun Gandhi यांच्या भेटीनंतर राऊतांनी उडवला धुरळा