Deglur bypoll Result | देगलूरमध्ये पुन्हा काँग्रेस, भाजपला धोबीपछाड ? वाढलेल्या मतदारांचा कल महत्त्वपू्र्ण ठरण्याची शक्यता

| Updated on: Oct 31, 2021 | 10:21 PM

निवडणूक लागल्यावर लगेचच भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपमध्ये घेऊन त्यांची उमेदवारी जाहीर केली. याबरोबरच ही पोटनिवडणूकही चुरशीची होणार हे निश्चित झाले.

Deglur bypoll Result | देगलूरमध्ये पुन्हा काँग्रेस, भाजपला धोबीपछाड ? वाढलेल्या मतदारांचा कल महत्त्वपू्र्ण ठरण्याची शक्यता
DEVENDRA-FADNAVIS-ASHOK-CHAVAN
Follow us on

मुंबई : देगलूर-बिलोली मतदारसंघाचे काँग्रेसचे दिवंगत नेते रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे दुर्दैवाने एकाच वर्षात महाराष्ट्रात दुसरी पोटनिवडणूक लागली. काँग्रेस पक्षाकडून दिवगंत रावसाहेब अंतापूरकर यांचे पुत्र जितेश अंतापूरकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले गेले. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील यशामुळे उत्साहात असलेले महाराष्ट्रातील भाजपचे शीर्ष नेतृत्व देगलूरमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधात मोर्चे बांधणी करणार हे साहजिकच होते. निवडणूक लागल्यावर लगेचच भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपमध्ये घेऊन त्यांची उमेदवारी जाहीर केली. याबरोबरच ही पोटनिवडणूकही चुरशीची होणार हे निश्चित झाले. अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत असतानाच प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपने त्यांचा प्रचार सर्वोच्च पातळीवर नेला आणि चांगली मोर्चेबांधणी केली.

याआधी काँग्रेसने ही जागा 22433 मतांच्या फरकाने जिंकली

30 ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या मतदानात 64% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला देगलूर मतदारसंघामध्ये देगलूर आणि बिलोली या दोन तालुक्यांचा समावेश होतो. सदर मतदारसंघात 412 मतदान केंद्र असून मतदान हे 2,98,540 इतके आहे. 2019 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ही जागा 22433 च्या फरकाने जिंकली होती. सदर मतदारसंघात तीन नगरपालिका (देगलूर, बिलोली, कुंडलवाडी) आणि नऊ जिल्हा परिषद गटांचा समावेश आहे. येथे स्थानिक स्वराज संस्थेत कायमच काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे.

कॉंग्रेसने घेतली होती प्रचारात आघाडी

निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच जितेश अंतापुरकर हे गावोगावी भेटीगाठी घेत काही विकासकामांचे लोकार्पण करत मतदारांपर्यंत पोहोचलेले दिसले. तसेच अशोक चव्हाणही 2019 च्या लोकसभेत झालेल्या चुकीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांना सावध करताना दिसले. काँग्रेसकडून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री विजय वडेट्टीवार, मंत्री छगन भुजबळ, मंत्री धनंजय मुंढे, मंत्री नवाब मलिक, एच. के. पटेल अमोल मिटकरी यांच्यासह शायर इम्रान प्रतापगढी, अनिरुद्ध वनकर यांनीही प्रचार केला.

भाजपने केली निवडणूक प्रतिष्ठेची

भाजप सुरुवातीच्या काळात प्रचारात मागे पडलेले दिसले असले तरीही शेवटच्या टप्प्यात भाजपने चांगलाच जोर लावला होता. महाविकास आघाडी सरकारवर तसेच पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर भाजपने टीकेचा जोरदार हल्ला चढवलेला दिसला. भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रामदास आठवले, शेजारच्या कर्नाटकमधील भागवत खुब्बा, प्रभू चव्हाण, तसेच महाराष्ट्रातील आक्रमक तरुण नेते निलेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांनी सुभाष साबणे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला.

वंचित बहुजन आघाडीच्या उच्चशिक्षित उमेदवाराची चर्चा 

वंचित बहुजन आघाडीला लोकसभेत चांगले यश मिळाल्याने त्यांनी डॉ. उत्तम इंगोले यांना उमेदवारी दिली. संपूर्ण मतदारसंघात याची चर्चाही झाली. प्रचारासाठी बाळासाहेब आंबेडकरांची देगलूरला प्रचारसभा झाली. या सभेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. परंतु गर्दीचे मतांमध्ये कितपत रूपांतर होते याबाबत साशंकता आहे.

प्रचारादरम्यान झालेल्या पक्षांतरचा परिणाम किती?

माजी खासदार व अशोक चव्हाण यांचे नातेवाईक भास्करराव खतगावकर यांनी भाजपला सोडचिट्टी देत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कॉंग्रेसडून इच्छुक असलेले प्रसिद्ध उद्योजक यांनी भाजपमध्ये प्रवेश करत सगळ्यानाच धक्का दिला. परंतु या दोन्ही पक्षांतरामुळे मोठा फरक पडला असे दिसले नाही.

जातीय समीकरणे

देगलूर-बिलोली या राखीव असलेल्या मतदारसंघातही जातीय समीकरणे चालताना दिसत होती. मोठ्या प्रमाणात असलेल्या मराठा, मुस्लीम तसेच बौद्ध आणि मातंग समाजाच्या मतदारांपैकी बहुतांश मतदारांचा कल हा कॉंग्रेसकडे तर लिंगायत, धनगर आणि मनेरवार मतदारांचा बहुतांश कल हा भाजपकडे दिसून आला.

काँग्रेसची प्रचारातील आघाडी तोडण्यात भाजप मागे ?

भाजपने ऐनवेळी शिवसेनेतून भाजपमध्ये आलेले माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली खरी; परंतु त्यांचे भाजपचे कार्यकर्ते एनवेळी पक्षात आलेल्या सुभाष साबणे यांच्या प्रचारात कमी प्रमाणात समरस झालेले दिसून आले. प्रचारात असलेली पिछाडी भरून काढण्यासाठी भाजपने चांगलाच प्रयत्न केला. परंतु त्यांचे हे प्रयत्न अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या तुलनेत काही प्रमाणात कमी पडलेल्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे विजयाचे पारडे काँग्रेसकडे झुकू शकते.

वाढलेल्या मतदारांचा कल महत्वपूर्ण ठरणार

2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथे 61% मतदान झाले होते. तर यावेळी ते 64 टक्क्यांपर्यत गेल्याने वाढलेल्या मतदारांचा कल महत्वपूर्ण ठरणार आहे. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी हे वाढलेले मतदार आपल्याकडे वळेल असा दावा करतायत. त्यामुळे या लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे येत्या दोन नोव्हेंबर रोजीच्या निकालानंतरच समजणार आहे

– अनिकेत गवंडर (aniket.gavandar@gmail.com)

( लेखक राजकीय अभ्यासक असण्याबरोबर निवडणूक रणनिती आणि व्यवस्थापनाचे काम करतात. या लेखातील मते त्यांच्या स्वत:ची आहेत.)

इतर बातम्या :

महाविकास आघाडीमध्ये दूध साखरेसारखी ‌गोडी, आदित्य ठाकरेंची बाळासाहेब थोरातांसमोर चौफेर फटकेबाजी

Covid Vaccination: 50 टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण झालेल्या राज्यांची पंतप्रधान मोदी घेणार बैठक, महाराष्ट्राचा समावेश

आदित्य ठाकरे मांडी घालून बसले, विद्यार्थिनीला टाळी देत संवाद, बाळासाहेबांच्या नातवाचा हटके अंदाज काँग्रेस नेत्याला भावला

(degloor nanded bypoll winner analysis congress could defeat bjp said political analyst Aniket gavandar)