Rajya Sabha Election : जागा 6, उमेदवार 7, कोल्हापूरचा कोणता पैलवान बाद होणार? महाडिक की पवार? आखाड्याचं संपूर्ण गणित समजून घ्या

| Updated on: May 30, 2022 | 6:09 PM

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे.

Rajya Sabha Election : जागा 6, उमेदवार 7, कोल्हापूरचा कोणता पैलवान बाद होणार? महाडिक की पवार? आखाड्याचं संपूर्ण गणित समजून घ्या
कोल्हापूरचा कोणता पैलवान बाद होणार? महाडिक की पवार? आखाड्याचं संपूर्ण गणित समजून घ्या
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्यातील राज्यसभा निवडणुकीचं (rajya sabha election) चित्रं आता स्पष्ट झालं आहे. भाजपच्या (bjp) तीन, शिवसेनेच्या (shivsena) दोन आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रत्येकी एका उमेदवाराने राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेने आणि भाजपने उमेदवार उतरवला आहे. त्यामुळे या निवडणूक चुरशीची होणार असल्याचं चित्रं आहे. पहिल्या पसंतीची मते सर्वच पक्षांकडे आहे. त्यामुळे पहिल्या पसंतीच्या 42 मतांवर भाजपचे दोन, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी होणार आहे. मात्र, भाजप आणि शिवसेनेने सहाव्या जागेवर उमेदवार दिला आहे. भाजपकडे पुरेसा मतांचा कोटा नसतानाही भाजपने उमेदवार रिंगणात उतरवला आहे. दुसरीकडे शिवसेनेकडे मतांचा कोटा आहे. परंतु त्यात अपक्षांची मते लक्षणीय आहेत. अपक्षांच्या या मतांवरच भाजपचा डोळा असल्याने भाजपने उमेदवार देऊन शिवसेनेचं टेन्शन वाढवलं आहे. मतांची बेगमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे कोल्हापूरचा कोणता पैलवान बाद होणार आणि कोणता पैलवान विजयाचा गुलाला उधळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

राज्यसभेसाठी कोण कोण?

राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसकडून उत्तर प्रदेशातील नेते इमरान प्रतापगढी यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे.

महाडिक विरुद्ध पवार

शिवसेनेने शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपनेही कोल्हापुरातील मातब्बर नाव असलेले आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही पक्षांनी कोल्हापूरमधूनच उमेदवार दिले आहेत. दोन्ही पक्षांचं लक्ष कोल्हापूर राखण्यावर आहे. त्यामुळे कोल्हापुरातून उमेदवारी देण्यात आली आहे. युतीच्या काळात शिवसेनेचे कोल्हापुरातून सहाचे सहा आमदार निवडून आले होते. मात्र, शिवसेनेने कोल्हापूरला एकही मंत्रीपद न दिल्याने पक्षाविरोधात नाराजी होती. त्याचा फटका 2019च्या निवडणुकीत बसला आणि शिवसेनेचे पाच आमदार पडले. एकच आमदार निवडून आला. त्यामुळे गेलेली पत परत मिळवण्यासाठी शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांना आपली जन्मभूमी असलेल्या कोल्हापुरात फारसं यश मिळविता आलं नाही. कोल्हापुरातील प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या पदरी निराशा आली आहे. त्यामुळे कोल्हापुरातून राज्यसभेवर खासदार गेल्यास आगामी काळात कोल्हापुरातील राजकीय गणितं नीट बसवता येतील या हेतूने भाजपने कोल्हापुरातूनच उमेदवार दिल्याचं सांगितलं जातं.

आकडे काय सांगतात?

राज्यसभा निवडणुकीत आकड्यांचं गणित सर्वात महत्त्वाचं आहे. विजयासाठी 42 मतांची गरज आहे. भाजपकडे दोन उमेदवार पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतांनी निवडून येतील एवढी पुरेशी मते आहेत. दोन उमेदवार निवडून दिल्यानंतरही भाजपकडे अपक्षांची मते मिळून 31 मते शिल्लक उरतात. तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक उमेदवार निवडून येईल एवढी मते आहेत. त्यामुळे या चारही पक्षांचे पहिल्या पसंतीचे उमेदवार लिलया विजयी होणार आहेत.

राज्यसभेचा डाव असा रंगणार

राज्यसभेच्या निवडणुकीत मतांसाठीचा 1 ते 4 असा पसंती क्रम असतो. राज्यात प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी 42 मतांची आवश्यकता आहे. एवढी मते मिळाल्यावर उमेदवार पहिल्याच फेरीत विजयी होतो. पण 42 पेक्षा कमी मते मिळाली तर दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातात. सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक आणि संजय पवार यांच्यात लढत होणार आहे. सहाव्या जागेसाठी या दोन्ही उमेदवारांना साधारण 30 मते पहिल्या पसंतीची मिळतील अशी स्थिती आहे. पण एवढी मते पुरेशी नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांवर या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचं गणित ठरणार आहे. त्यासाठीच शिवसेना आणि भाजप कामाला लागली आहे.

मतांचा कोटा 41चा?

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. त्यामुळे सहाव्या जागेसाठीच्या मतांचा कोटा 42 ऐवजी 41 होईल असं सांगितलं जातं. प्रत्यक्षात 10 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशीच याबाबत अधिक खुसाला होईल.

मलिक, देशमुखांच्या मतांचं काय?

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. त्यामुळे त्यांना मतदान करता येईल का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या दोन्ही नेत्यांना मतदान करता आलं नाही तर त्याचा फटका आघाडीला बसू शकतो. मात्र, या दोन्ही नेत्यांना मतदान करता यावं म्हणून अर्ज करणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. तर, भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे रुग्णालयात अॅडमिट आहेत. त्यामुळे ते मतदानाला येतील की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. जगताप मतदानाला आले नाही तर त्याचा फटका भाजपला बसणार असल्याचं सांगितलं जात आहे.

फडणवीस काय म्हणाले?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आम्हीच जिंकणार असल्याचं स्पष्ट केलं. आज राज्यसभेच्या निवडणुकीसाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अनिल बोंडे हे माजी कृषी मंत्री होते. ते शेती तज्ज्ञ आहेत. त्यांनीही अर्ज दाखल केला आहे. पीयूष गोयल हे केंद्रातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. ते मुंबईचेच आहेत. त्यामुळे त्यांनीही अर्ज भरला आहे. आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील याचा मला विश्वास आहे, असं फडणवीस म्हणाले. आम्हाला घोडेबाजार करायचा नाही. आमचे तिन्ही उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. काही लोक आम्हाला मतदान करतील. आमचे तीन उमेदवार आहेत. त्यांचे तीन उमेदवार आहेत. त्यांनी एक उमेदवार मागे घ्यावा. म्हणजे घोडेबाजार होणार नाही, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.

राऊतांचा इशारा

शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट घोडेबाजार करणाऱ्यांना इशाराचा दिला आहे. लोकशाहीमध्ये कोणीही निवडणूक लढवू शकतो. पण कोणीही घोडेबाजार करू नये. जसे केंद्राचे लक्ष आहे. तसेच गृहखाते आणि मुख्यमंत्र्यांचंही या घोडेबाजारावर लक्ष आहे. या निवडणुकीत ईडी, सीबीआयचा वापर करू असं त्यांना वाटत असेल. पण आम्ही घाबरणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. तसेच निवडणुका झाल्या तर चांगलंच आहे. नाही झाल्या तरीही चांगलंच आहे. पण आमच्याकडे पुरेशी मते आहेत, असंही ते म्हणाले.