43 वर्षांपूर्वीचा ब्लॉकबस्टर, अमिताभ बच्चन यांच्यामुळे बदलेला चित्रपटाचा शेवट, अनेक वर्षानंतर समोर आलं कारण
अमिताभ बच्चन यांच्या ‘कुली’ चित्रपटाचा क्लायमॅक्स का बदलला? 43 वर्षांनंतर समोर आला रंजक किस्सा. नेमकं काय घडलेलं?

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या 'कुली' या चित्रपटाशी संबंधित एक रंजक किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे. तब्बल 43 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या मूळ कथेनुसार अमिताभ बच्चन यांच्या पात्राचा शेवटी मृत्यू होणार होता.

मात्र, एका गंभीर अपघातानंतर दिग्दर्शकांनी चित्रपटाचा क्लायमॅक्सच बदलण्याचा निर्णय घेतला. 'कुली'च्या शूटिंगदरम्यान अभिनेता पुनीत इस्सार यांच्यासोबतच्या एका अॅक्शन दृश्यात अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाले होते. या अपघातात त्यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती आणि अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्या काळात त्यांच्या प्रकृतीबाबत संपूर्ण देश चिंतेत होता. लाखो चाहत्यांनी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या होत्या. अपघातापूर्वी चित्रपटाच्या कथेनुसार खलनायकाची गोळी लागून अमिताभ यांनी साकारलेले 'इक्बाल' हे पात्र मृत्युमुखी पडणार होते. त्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेवर आधारित 'सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं' या गाण्याची भावनिक आवृत्ती दाखवण्याची योजना होती.

मात्र, अमिताभ बच्चन मृत्यूच्या दारातून परतल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. वास्तविक आयुष्यात मृत्यूशी झुंज देऊन परतलेल्या अमिताभ यांना पडद्यावर मारणे योग्य ठरणार नाही तसेच चाहत्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात असे त्यांना वाटले. त्यामुळे चित्रपटाचा शेवट बदलण्यात आला आणि अमिताभ यांचे पात्र जिवंत ठेवण्यात आले.

1983 मध्ये प्रदर्शित झालेला 'कुली' चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. चित्रपटाने त्या काळात सुमारे 18 कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगितले जाते. अमिताभ बच्चन यांना पुन्हा पडद्यावर पाहून अनेक प्रेक्षक भावूक झाले होते.