94 वर्षांपूर्वीचा तो सिनेमा, 72 गाणी असूनही ठरला सुपरहिट, आजही होतोय ट्रेंड
एखादा हिंदी चित्रपट हिट होण्यासाठी जितकी कथा महत्त्वाची असते, तितकीच त्याची गाणीही महत्त्वाची असतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्यात केवळ तीन-चार नव्हे, तर तब्बल ७२ गाणी होती.

बॉलिवूडमध्ये असे अनेक उत्कृष्ट चित्रपट बनतात ज्यांची खूप चर्चा होते. मात्र, यामध्ये काही चित्रपट अनेक वर्षांपूर्वी प्रदर्शित झाले आहेत, ज्यांचा उल्लेख आजही केला जातो. असाच एक चित्रपट सुमारे 94 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये चार-पाच नाही, तर तब्बल 72 गाणी होती. हा चित्रपट एका ऐतिहासिक कथेवर चित्रित करण्यात आला होता आणि याच कारणामुळे या चित्रपटाचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले आहे.

या चित्रपटाचे नाव 'इंद्रसभा' असून तो 1932 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जहानारा कज्जन आणि मास्टर निसार मुख्य भूमिकेत दिसले होते. चित्रपटात कथेपेक्षा गाण्यांवर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले होते. हा चित्रपट अशा वेळी प्रदर्शित झाला होता जेव्हा बोलपटांचे युग नुकतेच सुरू झाले होते. सुमारे 3 तास 31 मिनिटांच्या या चित्रपटातील गाणी जगातील सर्वात सुंदर ठिकाणांवर चित्रित करण्यात आली होती आणि त्यावर लाखो-करोडो रुपये खर्च करून उत्कृष्ट ट्रॅक तयार केले गेले होते.

या चित्रपटाची निर्मिती जे. जे. मदन यांनी केली होती. जहानारा कज्जन यांचा जन्म प्रसिद्ध गायिका सुग्गन बेगम यांच्या घरी झाला होता. जहानारा स्वतः एक उत्तम गायिका होत्या आणि 'इंद्रसभा' चित्रपटात त्यांनी आपली छाप सोडली होती. काही रिपोर्ट्समध्ये या चित्रपटात 69 तर काहींमध्ये 71 गाणी असल्याचा दावा केला जातो, परंतु गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 'इंद्रसभा'चे नाव सर्वाधिक गाणी असलेला चित्रपट म्हणून अधिकृतपणे नोंदवले गेले आहे.

चित्रपट 'इंद्रसभा'मध्ये 31 गझल, 9 ठुमऱ्या, 4 होळीची गाणी, 15 सामान्य गाणी, 2 चौबोले, ५ छंद आणि ८ इतर विविध गाणी समाविष्ट होती. आतापर्यंत या चित्रपटाचा विक्रम कोणालाही मोडता आलेला नाही. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनुसार, या चित्रपटात प्रत्येक पात्रासाठी एक विशेष गाणे होते. मुख्य अभिनेत्री जहानारा कज्जन केवळ अभिनयासाठीच नाही तर त्यांच्या आवाजासाठीही ओळखल्या जात होत्या आणि त्या काळात त्यांना 'बंगालची नाइटिंगेल' म्हटले जायचे, मात्र त्यांनी अत्यंत कमी वयात जगाचा निरोप घेतला.

'इंद्रसभा' हे मुळात एक उर्दू नाटक होते, जे पहिल्यांदा १८५३ मध्ये रंगमंचावर सादर करण्यात आले होते. हे पहिले संपूर्ण उर्दू रंगमंच नाटक मानले जाते, ज्याचा जर्मन भाषेतही अनुवाद करण्यात आला होता.