
नेवासा तालुक्यातील सौंदाळा गाव हे कायमच समाजहिताचे, प्रगत आणि प्रेरणादायी निर्णय घेणारे गाव म्हणून ओळखले जाते. याआधी शिवीगाळ बंदी, विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध योजना तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाचे ठराव सौंदाळा ग्रामपंचायतीमार्फत मंजूर करण्यात आले आहेत.

आता या गावाने सामाजिक समतेच्या दिशेने आणखी एक मोठं आणि ऐतिहासिक पाऊल टाकत ‘जातमुक्त गाव’ होण्याचा ठराव एकमुखी मंजूर केला आहे. सौंदाळा गावाच्या ग्रामसभेत सरपंच शरद आरगडे यांनी जात हद्दपार करण्याचा, म्हणजेच जातमुक्त गावाचा ठराव मांडला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी कोणताही विरोध न करता या ठरावाला संपूर्ण पाठिंबा दिला.

या निर्णयामुळे सौंदाळा गाव राज्यातच नाही तर देशभरात सामाजिक एकतेचा आदर्श ठरणार आहे. या ठरावानुसार, सौंदाळा गावामध्ये यापुढे जात, पंथ, धर्म किंवा वंशाच्या आधारे कोणताही भेदभाव केला जाणार नाही.

गावातील सर्व नागरिक समान असून, ‘माझी जात – मानव’ ही भावना स्वीकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आंतरजातीय विवाहांना पूर्णपणे मान्यता देण्यात आली असून अशा विवाहांना प्रोत्साहन देण्याचा निर्णयही ग्रामसभेत घेण्यात आला आहे.

गावातील सार्वजनिक ठिकाणे, ग्रामपंचायत कार्यालय, शासकीय योजना, सामाजिक व धार्मिक कार्यक्रम, विवाह समारंभ तसेच सण-उत्सवांमध्ये कोणत्याही प्रकारचा जातिभेद केला जाणार नाही. प्रत्येक नागरिकाला समान हक्क, समान वागणूक आणि समान संधी देण्याचा संकल्प या ठरावात स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे.

डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर वाढत असताना, जातीय द्वेष पसरवणाऱ्या संदेशांनाही आळा घालण्याचा ठोस निर्णय सौंदाळा ग्रामसभेने घेतला आहे.

कोणत्याही नागरिकाने सोशल मीडियावर जातिभेद करणारे, द्वेष निर्माण करणारे किंवा समाजात तेढ निर्माण करणारे संदेश पोस्ट केल्यास, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद या ठरावात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष व्यवहारासोबतच ऑनलाईन माध्यमांमध्येही समतेचा विचार रुजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.