एका बाजूला शिंदे-केसरकर, दुसऱ्या बाजूला भाई जगताप; अशोक खरात प्रकरणी आतापर्यंतचा सर्वात मोठा पुरावा, फोटोंमुळे खळबळ
अशोक खरात प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे आता बड्या नेत्यांपर्यंत पोहोचल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरात प्रकरणातील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि फोन कॉल्सच्या तपशीलावरून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.

अशोक खरात यांच्याशी संबंधित असलेल्या फोन नंबरच्या यादीमध्ये राज्यातील काही बड्या राजकीय नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींची नावे समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

अंजली दमानिया यांनी सादर केलेल्या टॉप १० फोन नंबर्समध्ये सर्वाधिक संवाद साधणाऱ्यांमध्ये त्यांच्या कुटुंबातील सदस्य मुलगी आणि पत्नी आहेत. मात्र, या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रुपाली चाकणकर यांचे नाव असल्याने दमानिया यांनी गंभीर शंका उपस्थित केली आहे.

दमानियांच्या माहितीनुसार, चाकणकर आणि खरात यांच्यात ३३,७२७ सेकंद इतका प्रदीर्घ संवाद झाला आहे. संस्थेच्या कामासाठी इतका प्रदीर्घ वेळ बोलण्याची गरज काय? या संवादाचे नेमके स्वरूप काय? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.

या प्रकरणातील तिसऱ्या क्रमांकाचा महत्त्वाचा चेहरा म्हणजे दीपक लोंढे. दमानियांच्या आरोपानुसार, लोंढे हा केवळ खरातचा जवळचा माणूस नसून तो एमआयडीसीमधील जमिनींचे व्यवहार आणि आर्थिक गैरव्यवहारातील मुख्य दुवा आहे.

दीपक लोंढेचे दीपक केसरकर यांच्याशी असलेले जवळचे संबंध आणि त्याचे १८९ कॉल्स हे मोठ्या आर्थिक देवाणघेवाणीकडे संकेत करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी अंजली दमानिया यांनी दीपक लोंढेचे विविध बड्या नेत्यांसोबतचे फोटो पत्रकार परिषदेत सादर केले आहेत.

यात प्रामुख्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर, मंत्री दादा भुसे, सुनील तटकरे, भाई जगताप या नेत्यांसोबतचे दीपक लोढेंचे फोटो आहेत.

"हा व्यक्ती सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या नेत्यांच्या इतक्या जवळ कसा आणि का?" असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रॉपर्टी डिलिंग आणि आर्थिक गैरव्यवहाराची 'एसआयटी' (SIT) मार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.