
जर तुम्ही तुमच्या पालकांसोबत चारधामला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. उत्तराखंडमधील प्रसिद्ध चार धाम म्हणजेच बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री या चारही मंदिरांचे दरवाजे लवकरच बंद होणार आहेत.

थंडी आणि बर्फवृष्टीमुळे भाविकांसाठी या पवित्र मंदिरांचे दरवाजे दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात बंद केले जातात. यानुसार बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री या चार धामांचे दरवाजे कधी बंद होतील याची तारीख समोर आली आहे.

उत्तराखंड सरकारने बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे बंद करण्याची तारीख विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर जाहीर केली. त्यापाठोपाठ इतर तीन धामांच्या तारखाही निश्चित करण्यात आल्या आहेत.

विजयादशमीनिमित्त पारंपारिक पूजा झाल्यानंतर, पंडितांनी चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे बंद करण्यासाठी एक शुभ मुहूर्त निश्चित केला आहे. यानुसार सर्वप्रथम गंगोत्री धामचे दरवाजे २२ ऑक्टोबर रोजी बंद होतील.

यानंतर, केदारनाथ धाम आणि यमुनोत्री धाम या दोन्ही मंदिरांचे दरवाजे २३ ऑक्टोबरच्या शुभ मुहूर्तावर बंद केले जातील. या चार धामांपैकी सर्वात शेवटी बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद होतात.

यंदा विजयादशमी (दसरा) निमित्त पारंपारिक पूजा झाल्यानंतर पंचांग गणनेनुसार, बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे २५ नोव्हेंबर रोजी बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या भाविकांना या वर्षी चार धामचे दर्शन करायचे आहे, त्यांनी या तारखा लक्षात ठेवणं गरजेचे आहे.

चारधाम हे हिमालयीन प्रदेशात आहे. हिवाळ्यात या ठिकाणी प्रचंड बर्फवृष्टी आणि थंडी असते. त्यामुळेच दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये चार धामचे दरवाजे यात्रेकरूंसाठी बंद केले जातात.

यानंतर हे दरवाजे थेट पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात उघडले जाते. चार धाम यात्रेसाठीची ही चार तीर्थश्रेत्र साधारण सहा महिने सुरु असतात. या काळात लाखो भाविक या मंदिरांना भेट देतात.