भोर तालुक्यातील भाटघर धरणाची पाणी पातळी घटली, प्राचीन पांडवकालीन मंदिर पाण्याबाहेर
भाटघर धरणातील पाणी कमी झाल्यावर दरवर्षी प्रकट होणारे ऐतिहासिक कांबरेश्वर मंदिर पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. १९२८ साली धरणामुळे जलमग्न झालेले हे प्राचीन शिवमंदिर, पाण्याचे असंख्य तडाखे सोसूनही आजही भक्कम उभे आहे. याची हेमाडपंती रचना, इतिहास आणि पाण्याखालील स्थापत्यशैली पाहण्यासाठी भाविक व इतिहासप्रेमी मोठी गर्दी करतात.

पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरणामध्ये 7 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा राहिला आहे. धरणाची पातळी वेगाने खाली गेल्यामुळे, वर्षभर पाण्यात लुप्त असणारे ऐतिहासिक 'कांबरेश्वर मंदिर' गेल्या आठ दिवसांपासून पाण्याबाहेर येऊ लागले आहे. वेळवंडी नदीवरील हे प्राचीन शिवमंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविक तसेच इतिहासप्रेमींची मोठी गर्दी होत आहे.

सन १९२८ मध्ये इंग्रज सरकारने लॉइड डॅम (भाटघर धरण) झाले, मात्र हे मंदिर धरणाच्या पाण्यात गेले. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस धरणातील पाणी कमी झाले की हे मंदिर पाण्याबाहेर येते. या मंदिराचे मूळ नाव 'कर्महरेश्वर' असल्याचे सांगितले जाते, परंतु कांबरे गावाच्या हद्दीत असल्याने ते 'कांबरेश्वर' म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच वास्तू विशारद, अभियंते, इतिहासप्रेमी आणि छायाचित्रकार या ठिकाणाला आवर्जून भेट देतात. दरवर्षी स्थानिक ग्रामस्थ मंदिरातील गाळ काढून स्वच्छता करतात, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

पाण्यातही वास्तुकला भक्कम मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात नेहमी गुडघाभर पाणी असते. भाविक पाण्यात हात घालून स्वयंभू शिवलिंगाला स्पर्श करतात. मंदिरात पार्वती माता आणि नंदीची मूर्ती आहे. मंदिराच्या भिंतींचे बांधकाम आयताकृती दगडांचे असून, कळसाचे बांधकाम चुनखडक, वाळू आणि विटांमध्ये आहे. दरवर्षी येणाऱ्या गाळामुळे मंदिराच्या समोरील पाच पायऱ्या जमिनीखाली गाडल्या गेल्या आहेत.


मंदिराच्या समोर प्राचीन शिळा आणि वीरगळ पाहावयास मिळतात. पाण्याचे असंख्य तडाखे खाऊनही हे मंदिर आजही भक्कम उभे आहे.

पांडवकाळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून रचना मात्र हेनाडपंती असल्याने हे पांडवकालीन मंदिर नसून हेमाडपंती आहे असं स्थानिकांच म्हणणे आहे..